Mahabaleshwar Rain: सह्याद्रीच्या कुशीत पावसाचा ‘धुमाकूळ’! कोयना धरणाचा १०० टीएमसीचा टप्पा पार, पाहा ताजी आकडेवारी
Mahabaleshwar Rain: नवजा आणि महाबळेश्वर पाणलोट क्षेत्रात ५ हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा पार; सह्याद्रीतील धुवाधार पावसामुळे कोयना जलसागराची पातळी १००.८१ टीएमसीवर.

Mahabaleshwar Rain – पावसाने जूनमध्ये पाठ फिरवली, जुलैच्या सुरुवातीला कोयना धरणातील पाणीसाठ्याची वाढ संथ राहिली आणि ‘यंदा धरण भरेल का?’ अशी चिंता निर्माण झाली. मात्र जुलैच्या उत्तरार्धात पावसाने जोर पकडला आणि ऑगस्टमध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगांवर मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी कोयना जलसागराने 100.81 टीएमसीचा टप्पा पार केला असून,
105.25 टीएमसी क्षमतेचे धरण पूर्ण भरण्यासाठी आता केवळ 4.44 टीएमसी पाणीसाठा बाकी आहे. यंदाच्या पावसाळ्याची सुरुवात कोयना धरणासाठी चिंताजनक होती. जून महिन्यात नवजा येथे केवळ 348 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 392 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरण पूर्ण क्षमतेच्या दिशेने जाण्यासाठी पाणलोट क्षेत्रात साधारणपणे 5 ते 6 हजार मिलिमीटर पर्जन्यमान महत्त्वाचे ठरते.
त्यामुळे जूनमधील अत्यल्प पावसाने धरण भरण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जुलैच्या सुरुवातीलाही धरणात अपेक्षित वेगाने पाण्याची आवक होत नव्हती. मात्र, जुलैच्या उत्तरार्धात पावसाने अचानक जोर धरला. त्यानंतर ऑगस्टमध्ये नवजा-महाबळेश्वरच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. जूनमधील तूट जुलै- ऑगस्टमधील दमदार पावसाने भरून काढली आणि जलाशयाची पातळी वेगाने वाढू लागली.
1 जून ते 25 ऑगस्ट या 86 दिवसांत नवजा आणि महाबळेश्वरने पाच हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला. नवजा येथे आतापर्यंत 5 हजार 2 मिलिमीटर, तर महाबळेश्वर येथे 5 हजार 49 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध, तर नवजा मुसळधार पावसासाठी ओळखले जाते. यंदा मात्र दोन्ही पाणलोट क्षेत्रांमध्ये पावसाची जणू चुरसच रंगली आणि त्याचा थेट फायदा कोयना जलसागराला झाला.
कोयनानगर येथे आतापर्यंत 3 हजार 916 मिलिमीटर पाऊस झाला. मात्र, धरण भरण्याच्या दृष्टीने नवजा आणि महाबळेश्वर या प्रमुख पाणलोट क्षेत्रातील पाऊस अधिक निर्णायक ठरतो. धरणाच्या भिंतीपासून पुढील भागात पडणारे पाणी नैसर्गिक प्रवाहांमधून कोयना जलाशयात येत असल्याने या क्षेत्रातील पर्जन्यमानाचा धरणातील जलसाठ्यावर मोठा परिणाम होतो.
दि. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता धरणाची पाणीपातळी 2160 फूट 1 इंच (658.393 मीटर) झाली. एकूण पाणीसाठा 100.81 टीएमसी (95.78 टक्के), तर उपयुक्त पाणीसाठा 95.69 टीएमसी (95.57 टक्के) झाला आहे. धरणात सध्या 3 हजार 343 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. कोयना धरणाची कमाल क्षमता 105.25 टीएमसी असल्याने पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ 4.44 टीएमसी पाण्याची गरज आहे.
त्यामुळे जूनमध्ये निर्माण झालेली चिंता आता संपुष्टात येत असून, धरण पूर्ण क्षमतेने कधी भरेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे. यंदाच्या पावसाळ्याने एक महत्त्वाचा धडा दिला आहे. एकूण पर्जन्यमानाबरोबरच पावसाचे वेळेवर होणारे वितरणही जलसाठ्यासाठी निर्णायक असते. जूनमधील कमी पावसामुळे कोयना धरणाची चिंता वाढली. मात्र, जुलैच्या उत्तरार्धापासून झालेल्या दमदार पावसाने काही आठवड्यांतच हे चित्र पालटले.






