Mahabaleshwar News – सुरूर–वाई–पाचगणी–महाबळेश्वर–पोलादपूर या महत्त्वाच्या मार्गावरील सुमारे १६ ते १८ किलोमीटर भागात गेल्या सहा महिन्यांपासून खोदकाम सुरू होते. मात्र कामाची गती अत्यंत संथ असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. परिणामी स्थानिक नागरिक, पर्यटक, व्यापारी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर व पाचगणी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या आंदोलनानंतर ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत संबंधित विभागांना रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित यंत्रणांना खड्डे त्वरित बुजवणे, दर्जेदार डांबरीकरण करणे आणि पर्यटकांच्या गैरसोयी टाळण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. सध्या पाचगणी–महाबळेश्वर मार्गावर खड्डे बुजवणे, डांबरीकरण आणि काँक्रीटिंगची कामे वेगाने सुरू आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक महाबळेश्वर व पाचगणी येथे येत असल्याने रस्त्याची अवस्था सुधारल्यास पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे धूळ, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका कमी होण्याची अपेक्षा आहे. नागरिकांना मोठा दिलासा भाजप नगरसेवक रविंद्र कुभारदरे म्हणाले, महाबळेश्वर–पाचगणी मार्ग हा पर्यटननगरीचा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. काही महिन्यांपासून नागरिक आणि पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी तातडीने दखल घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि त्यामुळेच रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला वेग आला आहे. ही दुरुस्ती सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई परिसरातील नागरिक, व्यापारी तसेच पर्यटन व्यावसायिकांनी ८ मार्च रोजी कडकडीत बंद पाळून पाचगणी–महाबळेश्वर मार्गावरील खड्डेमय रस्त्याच्या विरोधात जोरदार निषेध नोंदविल्यानंतर अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्डे बुजवणे, डांबरीकरण आणि दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू केली असून त्यामुळे पर्यटननगरीला मोठा दिलासा मिळाला आहे.