Mahabaleshwar News – महाबळेश्वर आणि पाचगणी ही राज्यातील महत्त्वाची पर्यटनस्थळे असून येथील स्थानिक अर्थव्यवस्था सुमारे ७० ते ८० टक्के पर्यटनावर अवलंबून आहे. शहरातील हॉटेल, निवासगृह, भोजनालय, अल्पोपाहारगृहे, खाद्यपदार्थ स्टॉल तसेच स्ट्रॉबेरीशी संबंधित खाद्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅसवर चालतात. गॅसचा पुरवठा कमी झाल्यास स्वयंपाकघर चालवणे कठीण होऊन अनेक हॉटेल तात्पुरते बंद ठेवावे लागण्याची शक्यता आहे. महाबळेश्वर-पाचगणी परिसरात दरवर्षी १० ते १५ लाख पर्यटक भेट देतात. विशेषतः मार्च-एप्रिलपासून सुरू होणारा उन्हाळी हंगाम हा पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. मात्र या काळातच गॅस टंचाई निर्माण झाल्यास अनेक पर्यटक आपली सहल रद्द करण्याची शक्यता आहे. हॉटेल व्यवसायिकांच्या अंदाजानुसार निवासगृहांमधील खोल्यांच्या दरात ४० ते ६० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. पर्यटन अर्थव्यवस्थेचा विचार केला तर एका पर्यटकाचा सरासरी खर्च पाच हजार ते दहा हजार रुपये इतका असतो. त्यामुळे महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील वार्षिक पर्यटन अर्थचक्र सुमारे सातशे पन्नास कोटी ते पंधराशे कोटी रुपये इतके असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. गॅस टंचाईमुळे एका हंगामातच पर्यटकांची संख्या ३० ते ५० टक्क्यांनी घटल्यास दोनशे ते पाचशे कोटी रुपयांपर्यंत थेट आर्थिक नुकसान होऊ शकते. याचा परिणाम स्थानिक हॉटेल व्यवसाय, छोटे व्यापारी, घोडेस्वारी व्यावसायिक, पर्यटन मार्गदर्शक तसेच हजारो हंगामी कामगारांवर होण्याची शक्यता आहे. महाबळेश्वर-पाचगणीसारख्या पर्यटनावर अवलंबून असलेल्या भागांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरत असून पर्यटन उद्योगासाठी नियंत्रित व नियमित गॅस पुरवठा सुरू ठेवणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्ष आणि युद्धपरिस्थितीमुळे जागतिक पातळीवर द्रवीकृत नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाच्या पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत घरगुती द्रवीकृत पेट्रोलियम वायू सिलिंडरला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर मर्यादा येऊ लागल्या असून देशभरातील हॉटेल, भोजनालय आणि लघुउद्योगांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्यटन उद्योगासाठी धोक्याची घंटा -आवश्यक वस्तू अधिनियमामुळे घरगुती गॅसला प्राधान्य -व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर मर्यादा -महाबळेश्वर-पाचगणी अर्थव्यवस्था ७०-८० टक्के पर्यटनावर अवलंबून -दरवर्षी १०-१५ लाख पर्यटकांची वर्दळ -एका हंगामात दोनशे ते पाचशे कोटीच्या नुकसानीची शक्यता