Madhubala-Dilip Kumar: मधुबालाने पत्रासोबत गुलाब पाठवून दिलीप कुमारकडे व्यक्त केलं होतं प्रेम; पुढे काय घडलं?
Madhubala-Dilip Kumar : एक काळ असा होता, जेव्हा मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमाच्या चर्चा संपूर्ण इंडस्ट्रीत रंगत होत्या.

Madhubala-Dilip Kumar: ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होते आणि पहिला दिवस असतो रोज डे (Rose Day) प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाब हा सर्वात सुंदर आणि अर्थपूर्ण प्रतीक मानला जातो.
बॉलिवूडच्या इतिहासातही गुलाबाशी जोडलेली एक अतिशय हळवी प्रेमकहाणी आहे ती म्हणजे मधुबाला (Madhubala) आणि दिलीप (Dilip Kumar) कुमार यांची.एक काळ असा होता, जेव्हा मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमाच्या चर्चा संपूर्ण इंडस्ट्रीत रंगत होत्या.
मधुबाला सुरुवातीला दिलीप कुमार यांच्या चाहत्या होत्या. हळूहळू ही आवड प्रेमात बदलली आणि दोघांमधील नातं द्विपक्षीय झालं. या प्रेमाची सुरुवात मात्र एका गुलाबाने झाली होती.
पत्रासोबत पाठवला होता गुलाब
मधुबालाने जेव्हा पहिल्यांदा दिलीप कुमार (Dilip Kumar ) यांना पाहिलं, तेव्हाच त्यांना त्यांच्यात आपलं संपूर्ण विश्व दिसलं. दिलीप कुमार त्या वेळी अविवाहित होते, मात्र मधुबालाच्या मनात काय चाललं आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. एक दिवस दिलीप कुमार यांच्याकडे एक व्यक्ती आली आणि तिने मधुबालाचं पत्र आणि एक पॅकेट दिलं.
त्या पत्रात मधुबालाने लिहिलं होतं, “मी तुम्हाला एक गुलाब पाठवत आहे. माझं प्रेम मान्य असेल, तर हा गुलाब तुमच्याजवळ ठेवा; नसेल तर याच हातांनी मला परत पाठवा.” दिलीप कुमार यांनी तो गुलाब आपल्या जवळ ठेवला आणि तिथूनच बॉलिवूडमधील या अजरामर प्रेमकहाणीची सुरुवात झाली.
नऊ वर्षांचं नातं, पण शेवट दु:खद
मधुबाला आणि दिलीप कुमार यांची पहिली भेट १९५१ साली आलेल्या ‘तराना’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर त्यांनी आणखी काही चित्रपट एकत्र केले. जवळपास नऊ वर्षं हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, हे नातं शेवटपर्यंत पोहोचू शकलं नाही.
मधुबालाचे वडील अताउल्ला खान यांना हे नातं मान्य नव्हतं. शिवाय आउटडोअर शूटिंगवरून वाद निर्माण झाले. ‘नया दौर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा वाद थेट कोर्टापर्यंत गेला. या प्रकरणात दिलीप कुमार यांनी दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांची बाजू घेतली, ज्यामुळे मधुबालाचं मन दुखावलं आणि दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.
‘मुगल-ए-आजम’मध्येही दिसलं अपूर्ण प्रेम
‘मुगल-ए-आजम’च्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांशी फारसं बोलत नसल्याचं सांगितलं जातं. मात्र, पडद्यावर दिसणारं त्यांचं प्रेम हे केवळ अभिनय नव्हतं, तर त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या प्रेमाचं प्रतिबिंब होतं. दिलीप कुमार यांनी नंतर एका मुलाखतीत म्हटलं होतं, “मी मधुबालावर नेहमीच प्रेम करत राहीन.”
२३ फेब्रुवारी १९६९ रोजी अवघ्या ३६व्या वर्षी मधुबालाने हृदयविकारामुळे जगाचा निरोप घेतला. तर दिलीप कुमार यांचं २०२१ मध्ये निधन झालं. मात्र, त्यांची प्रेमकहाणी आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे.







