M. T. Ramesh : शबरीमला चोरी प्रकरणी मोदींनी हस्तक्षेप करावा; एम. टी. रमेश यांनी केली मागणी

थिरुवनंतपुरम : शबरीमला मंदिरात अलिकडेच झालेल्या सोन्याच्या चोरीसंदर्भात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज्य भाजपाचे सरचिटणीस एम. टी. रमेश यांनी केली आहे. या मागणीच्या पुष्ट्यर्थ एक कोटी स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शबरीमला मंदिरातील सोन्याच्या चोरीमागे मोठे कट असल्याचा आरोप रमेश यांनी केला. या चोरीमध्ये सत्ताधारी सीपीएमचे एकेजी सेंटर सहभागी आहे.
केरळ उच्च न्यायालयाच्या अलिकडच्या निरीक्षणांवरून हे स्पष्ट होते की हे प्रकरण एका व्यक्तीपुरते मर्यादित नाही तर एका आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता आहे. ही साधी चोरी नाही. सरकारी अधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये संगनमत असल्याचे दिसून येते. भाजपने आधीच हा मुद्दा उपस्थित केला होता आणि आता न्यायालयानेही या संदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. जगभरातून दरवर्षी लाखो भाविक शबरीमला मंदिरात येतात. त्यामुळे केंद्र सरकारने मंदिराच्या सुरक्षेसाठी थेट हस्तक्षेप करावा.
भाजप १० ते २० नोव्हेंबर दरम्यान घरोघरी जाऊन लोकांच्या स्वाक्षऱ्या गोळा करेल. याशिवाय, १० ते १५ नोव्हेंबर दरम्यान केरळमधील २५ ठिकाणी अय्यप्पा संरक्षण संगम नावाचे कार्यक्रम आयोजित केले जातील. मंदिरांची देखरेख करणारे देवस्वम बोर्ड भ्रष्टाचाराचे अड्डे बनले आहेत. या बोर्डांवर आता अविश्वासू लोकांनी कब्जा केला आहे. ते मंदिराच्या मालमत्तेचा वापर लुटण्याचे साधन म्हणून करत आहेत. आता मंदिरांचे व्यवस्थापन भाविकांना सोपवण्याची वेळ आली आहे, अशी माहिती रमेश यांनी दिली.





