प्रभात वृत्तसेवा आळंदी – संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा गेली चार दिवसांपासून आळंदी नगरीत सुरू आहे. या काळात पीएमपीएमएलकडून भाविकांची वारेमाप लूट होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते व प्रवासी संघाचे माजी अध्यक्ष मनसुख लोढा यांनी केली आहे. बसचे तिकीट आळंदीपर्यंतचे घेऊनही, भाविकांना आळंदीपासून दोन किलोमीटर अलीकडेच (काटे वस्ती येथे) उतरवले जात आहे, ज्यामुळे भाविकांचा अतिरिक्त खर्च व गैरसोय होत आहे. स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, कात्रज आणि कोथरूड या मार्गांवरून भाविकांसाठी आळंदीला जाण्यासाठी पीएमपीएमएल बसेस ठेवल्या जातात. मात्र, या बसेस आळंदीपर्यंत न जाता काटे वस्ती येथेच थांबविल्या जातात आणि प्रवाशांना उतरवले जाते. तिकिटावर ‘पुणे स्टेशन ते आळंदी’ असा उल्लेख असून पूर्ण तिकीट दर घेतला जातो. लोढा यांनी पीएमपीएमएलने दरवर्षी होणारी भाविकांची ही लूट थांबवावी अशी मागणी केली आहे. याची दखल न घेतल्यास कोर्टाकडे तसेच ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याची तयारी असल्याचे मनसुख लोढा यांनी प्रतिनिधीला सांगितले आहे. दोन किलोमीटर अलीकडे सोडल्यामुळे भाविकांना पुढे आळंदीकडे जाण्यासाठी दोन ठिकाणी रिक्षा बदलाव्या लागतात. तसेच पोलिसांमुळे रिक्षा थांबवल्यास अखेरचा प्रवास पायीच करावा लागतो. यामुळे भाविकांचा पुण्यापासून आळंदीपर्यंत येण्याचा खर्च शंभर रुपयांपर्यंत पोहोचतो. – मनसुख लोढा, प्रवासी संघाचे माजी अध्यक्ष