Loni Kalbhor News – लोणी काळभोर परिसरात गेल्या आठवड्यापासून पेटलेला कचर्याचा प्रश्न अखेर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर तात्पुरता मार्गी लागला आहे. या प्रकरणी पुढील तोडगा काढण्यासाठी उद्या हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्यानंतर कचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत पुढील दिशा ठरणार आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुणे शहर पोलीस दलातील परिमंडळ 6 चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांनी पुढाकार घेत मध्यस्थी केली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर कचरा वाहतूक तात्पुरती सुरू करण्यात आली.गेल्या आठवडाभर एमआयटी एडीटी विद्यापीठ प्रशासन आणि गावकरी यांच्यात उघड संघर्ष सुरू होता. मुळा-मुठा नदीपात्रात टाकलेल्या कचर्याला शुक्रवारी (दि. 27 फेब्रुवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक आग लागली होती. सुरुवातीला छोटी वाटणारी ही आग चार दिवस धुमसत राहिल्याने परिसरात काळेकुट्ट धुराचे लोट पसरले आणि विषारी वातावरण निर्माण झाले. याचा मोठा फटका एमआयटी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांना बसला. दरम्यान, मुळा-मुठा नदीपात्रात कचरा टाकणे तातडीने बंद करावे, या मागणीसाठी एमआयटी एडीटी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बुधवार (दि. 4 मार्च) पासून कचरा बंद आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने कदमवाकवस्ती आणि लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या कचरा वाहून नेणार्या गाड्यांना विद्यापीठ परिसरातून नदीकडे जाण्यास बंदी घातली. परिणामी दोन्ही गावांमध्ये कचर्याचे ढीग साचून दुर्गंधी, डास-माशांचा प्रादुर्भाव आणि रोगराईची भीती निर्माण झाली होती. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांनी आंदोलनस्थळी भेट देत मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नांनंतर कचर्याचे ट्रॅक्टर पुन्हा नदीपात्रात सोडण्यात आले. मात्र सात दिवसांत कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास विद्यापीठातून कचरा वाहतूक बंद करण्यात येईल, अशी भूमिका विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केली आहे. या चर्चेदरम्यान एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, लोणी काळभोरचे सरपंच नागेश काळभोर, भोलेनाथ शेलार, ड. सुजीत कांबळे, कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदू काळभोर, चित्तरंजन गायकवाड, ग्रामविकास अधिकारी एस. एन. गवारी तसेच दोन्ही ग्रामपंचायतींचे उपसरपंच, सदस्य आणि आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.