Lonavala News : ११० वर्षांचा प्रश्न अखेर सुटला! भुशी गावातील प्रत्येक घराला मिळाला मालकी हक्क..जाणून घ्या नेमके प्रकरण

प्रभात वृत्तसेवा
लोणावळा – मावळ तालुक्यातील भुशी गावाचा तब्बल ११० वर्षांपासून प्रलंबित असलेला राहत्या घरांच्या मालकीहक्काचा प्रश्न अखेर सुटला आहे. हा ऐतिहासिक निर्णय आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाला आहे. गावकऱ्यांच्या आयुष्यात हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा ठरला आहे.भुशी गावातील नागरिकांना शासनाच्या वतीने प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात आले.
या वेळी मावळचे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, उपअधीक्षक भूमी अभिलेख पल्लवी पिंगळे तसेच लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साबळे यांच्या उपस्थितीत सनद वितरण कार्यक्रम पार पडला.आज प्रत्येक भुशी ग्रामस्थाला त्यांच्या घराचा कायदेशीर मालकी हक्क प्राप्त झाला असून, गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी आमदार शेळके यांचा सत्कार करत त्यांच्या जनसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
नेमके प्रकरण काय..
या प्रकरणाची मुळे १९१३ सालापर्यंत जातात. त्या काळात टाटा धरण प्रकल्पासाठी भुशी गाव विस्थापित करण्यात आले, मात्र विस्थापित ग्रामस्थांचे कायदेशीर पुनर्वसन कधीच झाले नाही. परिणामी गावकऱ्यांकडे त्यांच्या राहत्या घरांचा कायदेशीर मालकी हक्क नसल्याने ते शासनाच्या कागदोपत्री अनधिकृत रहिवासी ठरत होते. अनेक पिढ्यांनी न्यायासाठी प्रयत्न केले, पण प्रश्न सुटला नाही. १९७६ पासून पांडुरंग मराठे, सोपान मराठे, भागूजी न्हालवे यांनी या प्रश्नासाठी संघर्ष सुरू केला.
त्यानंतर २०१२ मध्ये अॅड. मुरलीधर मराठे, चंद्रकांत मराठे, दिलीप न्हालवे, निवृत्ती मराठे, बाबुराव मराठे, रावजी मराठे, सचिन मराठे, सुनील मराठे, साहेबराव चव्हाण, गुलाब मराठे व इतर ग्रामस्थांनी पाठपुरावा सुरू ठेवला. या सर्वांच्या प्रयत्नांना आमदार सुनील शेळके यांनी दिशा आणि वेग दिला. त्यांनी संबंधित विभाग, महसूल मंत्रालय आणि प्रशासन यांच्याशी सातत्याने संवाद साधून हा ११० वर्षांचा प्रश्न मार्गी लावला.





