Rahul Gandhi : पंजाब ते दिल्लीपर्यंत शेतकऱ्यांचा मोर्चा सुरू झाला आहे. ‘दिल्ली चलो’ मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अडवण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे सीमेवरील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी शेतकरी आंदोलकांवर अश्रुधुराचे नळकांडे फोडले. शेतकऱ्यांना सुमारे 300 मीटर मागे ढकलण्यात आले आहे, मात्र आंदोलक अजूनही दिल्लीत प्रवेश करण्यावर ठाम आहेत. एकीकडे किमान आधारभूत किंमतीवर कायदेशीर हमी न देण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकार अडकले असताना दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.
राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान घोषणा केली की जर त्यांचा पक्ष 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत जिंकला तर एमएसपीची हमी देण्यासाठी कायदा केला जाईल. याबाबत राहुल गांधी यांनी ट्विट करत लिहिले की, “शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. स्वामिनाथन आयोगानुसार प्रत्येक शेतकऱ्याला पिकांवर एमएसपीची कायदेशीर हमी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. हे पाऊल 15 कोटी शेतकरी कुटुंबांची समृद्धी सुनिश्चित करून त्यांचे जीवन बदलेल. न्यायाच्या मार्गावर काँग्रेसची ही पहिली हमी आहे.”
किसान भाइयों आज ऐतिहासिक दिन है!
कांग्रेस ने हर किसान को फसल पर स्वामीनाथन कमीशन के अनुसार MSP की कानूनी गारंटी देने का फैसला लिया है।
यह कदम 15 करोड़ किसान परिवारों की समृद्धि सुनिश्चित कर उनका जीवन बदल देगा।
न्याय के पथ पर यह कांग्रेस की पहली गारंटी है।#KisaanNYAYGuarantee
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 13, 2024
“भारतातील शेतकऱ्यांना एमएसपी हमी देण्यासाठी कायदा करू”
पुढे ते म्हणाले, “इंडिया आघाडी सरकार आल्यास आम्ही शेतकऱ्यांना एमएसपीची हमी देऊ, ही फक्त आमची सुरुवात आहे. आज शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. त्यांना रोखले जात आहे, त्यांच्यावर अश्रुधुराचे नळकांडे डागले जात आहेत. ते काय म्हणत आहेत? ते फक्त त्यांच्या मेहनतीचे फळ मागत आहेत. भाजप सरकारने एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली.”
“एमएस स्वामीनाथन यांनी सांगितलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यास ते तयार नाहीत. त्यांनी आपल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, शेतकऱ्यांना MSP चा कायदेशीर अधिकार मिळायला हवा. इंडिया आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर भारतातील शेतकऱ्यांना एमएसपी हमी देण्यासाठी कायदा करू. स्वामिनाथन अहवालात जे सांगितले आहे ते आम्ही पूर्ण करू. या देशातील गरीब, शेतकरी, मजूर आणि छोटे व्यापारी यांच्यावर रोज अन्याय होत आहे. ज्या समाजात अन्याय असेल तिथे हिंसा आणि द्वेष असेल. ”
दिल्लीत ट्रॅक्टर-ट्रॉलीला परवानगी नाही
शेतकऱ्यांच्या दिल्लीकडे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्यात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी, शहरात कलम 144 लागू केले. तसेच शहरात ट्रॅक्टर ट्रॉलीला परवानगी नाही. सोशल मीडियावरही लक्ष ठेवले जात आहे. सुरक्षेसाठी ड्रोन हे प्रभावी साधन आहे, आम्ही त्याचा वापर करू, असे म्हटले.