नगर – 1969 पूर्वी अथवा नंतर नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांना आपल्या जन्माची नोंद करुन जन्म दाखला मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला असून ही अखेरची संधी आहे. 14 मे 2020 नंतर वंचित राहिलेल्यांना जन्म नोंदणी करता येणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
पूर्वीच्या काळी गर्भवती मातांसाठी प्रसुती व्यवस्था नसल्याने घरातच प्रसूती होत असे, त्यामुळे बाळाच्या जन्माची नोंद सहसा कुणी करीत नसत. शहरी भागात देखील प्रसुतीगृहात जन्माला आलेल्यारुग्णालयामार्फत होऊनही अनेकांनी जन्म दाखले घेतलेले नसत. त्यामुळे, नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांना जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंद करुन जन्म दाखले मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
शासनाच्या आरोग्य सेवा विभागाची उपसंचालक तथा राज्याचे जन्म-मृत्यू उपमुख्य निबंधकांनी एका अधिसुचनेव्दारे जाहीर केले आहे. ज्या नागरिकांची जन्माची नोंदणी 1 जानेवारी 2000 पूर्वी झालेली आहे, ज्यांच्या नोंदणीला 15 वर्षाचा कालावधी लोटला आहे, अशा सर्व नागरिकानां जन्म नोंदणीची संधी मिळणार आहे. किंबहूना सन 1969 पूर्वी नोंदणी केलेल्या व्यक्ती अथवा त्यांच्या पालकांना जन्म नोंद करता येणार असून ही मुदत केवळ 14 मे 2020 पर्यंतच उपलब्ध असेल. त्यानंतर हा कालावधी कुठल्याही परिस्थितीत वाढवून मिळणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे.
नागरिकांनी नावाच्या खात्रीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्ड यापैकी एका पुराव्यासह जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. नवजात बालकांसाठी 21 दिवसांच्या आत नोंद केली असल्यास मोफत जन्म दाखल्याची प्रथम प्रत मोफत आणि पुढील प्रत्येक प्रतीसाठी 20 रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात येते. त्याच धर्तीवर आता अर्ज करणाऱ्या नागरिकांनाही 20 रुपये शुल्क आणि अवघे पाच रुपये विलंब शुल्क आकारुन जन्म नोंदीचे प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती ठाणे महापालिका जन्म व मृत्यू विभागाकडून देण्यात आली.