अँटिग्वा: वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना अनुकुल खेळपट्टी असल्यामुळे त्यांचे गोलंदाज उसळत्या चेंडूंचा अधिकाधिक उपयोग करण्याची शक्यता आहे. फलंदाजीस आल्यावरच असे चेंडू आले तर आपोआपच आपली मानसिक तयारी होते. अशा चेंडूंना मी अजिबात घाबरत नाही असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सर व्हिव्हियन रिचर्ड यांच्याशी गप्पागोष्टी करताना सांगितले.
लंडन येथे झालल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा चेंडू ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथच्या गळ्यावर जोरात आदळला होता. त्यामुळे तो जखमी झाला आणि त्याला या कसोटीतील दुसऱ्या डावात आणि तिसऱ्या कसोटीतूनही माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळेच सध्या उसळत्या चेंडूंबाबत विचारमंथन सुरू आहे. त्याविषयी कोहली म्हणाला की, फलंदाजीस आल्यानंतर उसळत्या चेंडूंचा आपल्याला मार खावा लागणार आहे याची आपल्याला जाणीव असते आणि आपण त्यादृष्टीने मानसिक तयारीही करीत असतो. असे चेंडू खेळताना अनेक वेळा येतात तरीही खेळताना सुरूवातीलाच अशा चेंडूंवर खेळावयास मिळाले तर आपोआपच जागरूक होतो. जरी या चेंडूमुळे काही वेळा मुका मार बसतो. मात्र असे चेंडू मला प्रेरणा देत असतात. अशा प्रसंगांना यशस्वीरित्या सामोरे जातच आपली खेळी होऊ शकते.
रिचर्डस यांनी फारसे हेलमेट वापरले नाही. त्याविषयी कोहलीने विचारले असता त्यांनी सांगितले की, हेलमेट परिधान केले की मला खूप त्रास व्हायचा. त्यापेक्षा माझ्या देशाची टोपीच मला सुरक्षित वाटत असे. हेलमेटपेक्षा टोपी घातली की आपोआपच आपण देशासाठी खेळत असल्याची भावना आपल्यामध्ये येते. जरी मला काही वेळा दुखापत झाली असली तरी त्याचे खापर प्रतिस्पर्धी खेळाडूवर कधीही फोडले नाही. याबाबत माझीच काहीतरी चूक झाली असावी असे मी मानत असे. मात्र खेळाडूंनी आपली सुरक्षा आपणच केली पाहिजे असे माझे मत आहे.
रिचर्डसविषयी कोहलीने सांगितले की, मी व आमच्या संघातील प्रत्येक खेळाडूला त्यांचा खूप आदर वाटतो. फलंदाजी करताना आक्रमक फटके मारण्याची त्यांची शैली अफलातूनच होती. तशी शैली अन्य खेळाडूंना जमणे शक्य नाही.