Kiren Rijiju : लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरी आहे. राहुल गांधींचे संपूर्ण भाषण असत्याने भरलेले असून, सभागृहाच्या कामकाजातून त्यांचे खोटे दावे काढून टाकण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरण रिजीजू यांनी बुधवारी दिली. राहुल गांधींच्या भाषणानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रिजीजू यांनी काँग्रेस नेत्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. राहुल गांधी यांनी सभागृहात मांडलेल्या विधानांची सत्यता पडताळण्यासाठी सत्ताधारी आघाडीकडून अध्यक्षांकडे नोटीस बजावण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधींनी जे काही खोटे आरोप केले आहेत, ते कामकाजातून हटवण्याची मागणी आम्ही करणार आहोत. त्यांनी आपल्या विधानांचे पुरावे देण्याचे आश्वासन दिले असले तरी, ते कधीही सत्यता सिद्ध करू शकणार नाहीत, कारण त्यांचे संपूर्ण भाषणच खोटेपणावर आधारित आहे, असा दावा रिजीजू यांनी केला. गांधी हे जाणीवपूर्वक सभागृहात खोटे बोलतात आणि संबंधित मंत्र्यांचे उत्तर ऐकण्यासाठी न थांबता बाहेर निघून जातात. विरोधी पक्षनेतेपदासारख्या जबाबदार पदावर बसलेली व्यक्ती गंभीर नसणे हे देशाचे दुर्दैव असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. या भाषणात राहुल गांधी यांनी मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यावर पूर्वसूचना न देता गंभीर आरोप केले असून, हा विशेषाधिकार भंगाचा प्रकार असल्याचे रिजीजू यांनी नमूद केले. भारत ही विक्रीची वस्तू नाही भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करारावरून राहुल गांधींनी केलेल्या भारत माता विकली या विधानावर रिजीजू यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “भारत ही विक्रीची वस्तू नाही आणि तसा विचारही कोणी करू शकत नाही. २०११-१२ मध्ये भारताची गणना जगातील पाच नाजूक अर्थव्यवस्थांमध्ये होत होती, मात्र आज भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेण्यास सज्ज आहे, अशा शब्दांत त्यांनी गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.