Khopoli Municipal Council: १०० कोटींचा घोटाळा की राजकीय स्टंट? खोपोली पालिकेतील आरोपांवर नगराध्यक्षांचा मोठा गौप्यस्फोट
Khopoli Municipal Council: भाजप नगरसेविका सानिया शेख यांचे सनसनाटी आरोप; राजकीय वादातून बदनामी होत असल्याचा नगराध्यक्ष शेंडे यांचा पलटवार.

Khopoli Municipal Council – खोपोली नगरपालिकेतील विकासकामांमध्ये तब्बल १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्या विद्यमान नगरसेविका सानिया शेख यांनी केला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पालिकेची बाजू स्पष्ट केली. आरोपांमध्ये नमूद केलेल्या कामांचा खर्च आणि १०० कोटी रुपयांचा आकडा यामध्ये ताळमेळ नसल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेविका शेख यांनी प्रभाग क्रमांक १२ व १४ मधील नेहरू गार्डन आणि भानवज येथील उद्यान सुशोभीकरणाच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच प्रभाग क्रमांक ६ मधील उर्दू शाळेच्या टर्फ मैदानाच्या कामात अनियमितता झाल्याचा दावा केला आहे. कारंजे आणि वॉटर फॉलसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
टेंडर प्रक्रियेवरही शेख यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. निविदेसाठी निर्धारित मुदत असतानाही कमी कालावधीत प्रक्रिया करण्यात आल्याचा, तसेच निविदा भरणाऱ्या कंपन्यांमध्ये संगनमत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित कंत्राटदारांना आवश्यक पूर्वानुभव नसतानाही कामे देण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.
मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले. टर्फ मैदानाच्या कामाची निविदा महा-ई-टेंडर पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती. वर्तमानपत्रातही जाहिरात देण्यात आली होती. नियमानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून निविदा उघडण्याची प्रक्रिया निर्धारित वेळेतच झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काम पूर्ण झाल्यानंतर थर्ड पार्टी ऑडिट केले जाते.
त्यानंतरच संबंधित ठेकेदाराचे बिल अदा केले जाते, अशी माहिती पाटील यांनी दिली. टर्फ मैदानाच्या मंजूर ठेकेदार आणि तक्रारदार यांच्यातील राजकीय वादातून हे आरोप करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. नगराध्यक्ष शेंडे यांनी टर्फ मैदान आणि उद्यानांच्या कामांचा एकत्रित खर्च सुमारे पाच ते सात कोटी रुपयांच्या आत असल्याचे सांगितले.
त्यामुळे १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आकडा कुठून आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आरोप केलेल्या यादीतील अनेक कामांना अद्याप सुरुवातही झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजमाध्यमांवर खोपोली पालिकेच्या कामकाजाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्याने पालिकेची आणि नगरसेवकांची बदनामी होत असल्याचे शेंडे यांनी सांगितले.






