खेड शिवापूर टोल नाका स्थलांतरित करा; कामे पूर्ण होईपर्यंत टोल बंद ठेवा: वंचित बहुजन युवा आघाडीचे शिवश्री अभिषेक वैराट

पुणे : खेड शिवापूर टोल नाका परिसरातील गंभीर समस्या, अपूर्ण रस्ते व अपघातांच्या वाढत्या घटनांचा निषेध करत वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्ह्याच्या वतीने आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) व पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात टोल नाका स्थलांतरित करावा आणि तोपर्यंत टोल वसुली थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाचे नेतृत्व वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवश्री अभिषेक संतोष वैराट यांनी केले.
रस्त्यांची दुरवस्था – नागरिकांचे जीव धोक्यात
निवेदनात नमूद करण्यात आले की, टोल नाका परिसरातील रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. लाईट व्यवस्थेचा पूर्णतः अभाव असल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना प्रचंड अडचणी येत आहेत. अपघातांमध्ये नागरिकांचा जीव गमावण्याच्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे, रस्ता आणि लाईट कामे पूर्ण होईपर्यंत टोल बंद ठेवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
भोर व राजगड तालुक्याच्या विकासाला अडथळा
वंचित बहुजन युवा आघाडीने स्पष्ट केले की, सध्याच्या ठिकाणी असलेला टोल नाका भोर व राजगड तालुक्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला अडथळा ठरतो आहे. त्यामुळे टोल नाका दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करणे अत्यावश्यक आहे. यासाठी याआधीही प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने देण्यात आली असूनही कुठलीच ठोस कारवाई झालेली नाही, अशी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
पावसाळ्यात समस्या गंभीर – जलसाच्यामुळे दुर्घटना
पश्चिम महाराष्ट्रात पावसाळा सुरु होताच अपूर्ण सेवा रस्त्यांवर पाणी साचते. यामुळे जलसंचय व दुर्गंधी निर्माण होत असून फ्लायओव्हरखालचे टनेल व निचऱ्याचा अभाव असल्यामुळे अपघात वाढले आहेत. लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण – नागरिक त्रस्त
शिवश्री अभिषेक वैराट यांनी सांगितले की, पावसाच्या दिवसात डांबरीकरणाचे काम चालू असल्याने कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. डांबर व्यवस्थित चिकटत नाही. अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने रस्ते पुन्हा पुन्हा उखडले जात आहेत, ज्यामुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतो.
राजकीय दुर्लक्ष – केवळ आश्वासने, कृती नाही
स्थानिक आमदार, खासदार व संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशी तक्रार वंचित बहुजन युवा आघाडीने केली. केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेली जाते, प्रत्यक्षात काहीच सुधारणा होत नाही, अशी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लक्ष वेधले
या समस्येकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. नितीन गडकरी यांनी वैयक्तिक लक्ष घालावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. “इतर राज्यांमध्ये रस्त्यांचे दर्जेदार काम झाले आहे, मग पुणे-सातारा महामार्गावर इतका दुर्लक्ष का?”, असा प्रश्न उपस्थित करत पूर्ण महामार्ग पुनर्बांधणी व टोल स्थलांतराची मागणी करण्यात आली.
विशेष बैठक – रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरशी संवाद
खेड शिवापूर: दि. ९ जून खेड शिवापूर टोल नाका व परिसरातील समस्या लक्षात घेता, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक वैराट यांनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे वरिष्ठ अधिकारी अमित भाटिया (GM – Revenue & Operations, Regional Head – West Region) व बद्री प्रसाद शर्मा (Manager – खेड शिवापूर टोल नाका) यांच्यासमवेत विशेष बैठक घेतली.
डिव्हायडर तोडण्याचे प्रकार – सुरक्षा नाही म्हणून काम रखडले
बैठकीत डिव्हायडर तोडण्याच्या तक्रारी मांडण्यात आल्या. यावर अमित भाटिया यांनी स्पष्ट केले की, स्थानिक व्यावसायिकांकडून डिव्हायडर तोडले जातात, परंतु पोलिस संरक्षण मिळत नाही. कामगारांवर हल्ले होतात, त्यामुळे काम पूर्ण करता येत नाही. त्यांनी थेट उत्तर दिले की – “तुम्हालाच वेळ असेल तर डिव्हायडर लावा!”
जबाबदारी झटकण्याची प्रवृत्ती – NHAI कडे झुकवले बोट
बैठकीत टोल व्यवस्थापनाने अनेक समस्यांवर “ते आमच्या अखत्यारीत नाही, ते NHAI कडे आहे,” असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. रखडलेले रस्ते, अपघातांचे प्रमाण, लाईट अभाव यावरही समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.
टोल कर्मचाऱ्यांचे वर्तन आक्षेपार्ह – महिलांशी गैरवर्तन
नागरिकांनी टोल कर्मचाऱ्यांच्या वर्तनावरही गंभीर आक्षेप घेतला आहे. महिला कर्मचाऱ्यांकडून शिवीगाळ, स्थानिकांवर अकारण दंड, आणि टोल फ्री गाव दाखवूनही त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. परप्रांतीय कर्मचाऱ्यांना स्थानिक गावांची माहिती नसल्यामुळे हे गैरवर्तन वाढत आहे.
१६ जूनपर्यंत अल्टिमेटम – अन्यथा टोल बंद आंदोलन
शिवश्री अभिषेक वैराट यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,
“१६ जून २०२५ पर्यंत सर्व रखडलेली कामे – रस्त्यांचे डांबरीकरण, लाईट व्यवस्था, डिव्हायडर – पूर्ण न केल्यास खेड शिवापूर टोल बंद आंदोलन व उपोषण छेडले जाईल. याची पूर्ण जबाबदारी एनएचएआय, टोल प्रशासन, आणि दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर राहील.”
उपस्थित मान्यवर
या बैठकीला रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे वरिष्ठ अधिकारी अमित भाटिया, बद्री प्रसाद शर्मा, कॉन्ट्रॅक्टर अतुल पारगे आणि वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व प्रश्नांवर अभिषेक वैराट यांनी ठामपणे भूमिका मांडली.
विकासाच्या दिशेने टोल नाका हटवा
ग्रामस्थ व स्थानिक नागरिकांच्या मते, टोल नाका हटवल्यास भोर-राजगड तालुक्यातील उद्योग, व्यवसाय, रोजगाराच्या संधी वाढतील. परंतु सद्यस्थितीत टोल व दुरवस्थेतील रस्ते हेच विकासाला अडथळा ठरत आहेत. टोल नाका व त्यासंबंधित प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले असून, वंचित बहुजन युवा आघाडीने या विषयावर ठामपणे आवाज उठवून आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता प्रशासन या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





