Khed News : नको हा रेल्वे प्रकल्प! खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश ; खासदार कोल्हे, आमदार काळे यांचा पाठिंबा

प्रभात वृत्तसेवा
चिंबळी – तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन या प्रस्तावित रेल्वेमार्गाला स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला असून, या प्रकल्पामुळे शेतजमिनी आणि घरांच्या मालकांना मोठे नुकसान सहन करावे लागणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकर्यांच्या सोबत राहण्याची ठाम भूमिका घेतली आहे.कुरूळी (ता. खेड) येथे तळेगाव-उरुळी कांचन रेल्वे प्रकल्पाच्या विरोधात आयोजित आंदोलनात नागरिकांसोबत लोकप्रतिनिधीही सहभागी झाले. या वेळी खासदार डॉ.
अमोल कोल्हे आणि आमदार बाबाजी काळे यांनी कुरूळीसह 12 गावांतील प्रकल्पबाधित शेतकर्यांचे मार्गदर्शन केले. स्थानिकांनी या मार्गाचा डीपीआर रद्द करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडे केली. या मार्गामुळे अनेक शेतकर्यांच्या शेतांवर, घरांवर आणि शेतीमार्गांवर थेट परिणाम होणार असून, शेतकर्यांना जमिनीच्या नुकसानीसोबतच उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.
स्थानिक शेतकर्यांनी यावेळी सांगितले की, यापूर्वीच शासनाने या भागातील मोठ्या प्रमाणात जमिनी एमआयडीसी, रिंगरोड आणि पुणे-नाशिक महामार्ग यांसारख्या प्रकल्पांसाठी संपादित केल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांकडे आता केवळ अत्यल्प शेती जमीन शिल्लक असून, तीच त्यांच्या उपजीविकेचा एकमेव आधार आहे. या आंदोलनामुळे रेल्वे प्रकल्पाबाबत प्रशासनासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, स्थानिक स्तरावर या विषयावर तीव्र चर्चा सुरू आहे.
“शेतकर्यांच्या बाजूने ठाम राहण्याची आमची भूमिका आहे. या प्रकल्पामुळे शेतकर्यांचे जगणे उद्ध्वस्त होईल. आम्ही या लढ्यात शेतकर्यांसोबत आहोत आणि त्यांचे हक्क वाचवण्यासाठी पुढे राहून लढा देऊ.”
-बाबाजी काळे. आमदार खेड आळंदी
“या भागातील जनतेच्या आणि शेतकर्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे. शेतकर्यांच्या हितासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील.”
-डॉ. अमोल कोल्हे, खासदार शिरूर





