Khalapur News – आंबा बागायतदारांच्या आशांवर यंदा बदलत्या हवामानाने पाणी फेरले आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीलाच आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर आल्याने बागायतदारांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकले होते. झाडांच्या फांद्यांवर मोहराचे गुच्छ दाटून आले असून काही ठिकाणी छोट्या आकाराची फळधारणा सुरूही झाली होती. मात्र वातावरणातील अचानक बदल, थंडी-धुक्याचा वाढलेला प्रभाव आणि तापमानातील चढ-उतारामुळे मोहर करपण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. परिणामी संपूर्ण हंगाम धोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. खालापूर तालुक्यात भात शेतीसोबत फळझाडांची शेती हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा पूरक व्यवसाय आहे. या माध्यमातून वर्षाकाठी चांगला नफा मिळत असल्याने अनेक शेतकरी बागायतीकडे वळले आहेत. विशेषतः गावरान आंबा आणि कलमी आंब्यांच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळतात. यंदा हिवाळा सुरू होताच आंब्याला भरघोस मोहर आल्याने उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. सोबतच बाजारपेठेतही दर्जेदार आंब्यांची आवक वाढेल, असा अंदाजही बांधण्यात आला होता. मात्र, जानेवारीनंतर हवामानात झालेल्या बदलामुळे परिस्थिती झपाट्याने बदलली. काही दिवस कडाक्याची थंडी, त्यानंतर दाट धुके आणि अचानक वाढलेल्या तापमानामुळे मोहरावर विपरीत परिणाम झाला. अनेक बागांमध्ये मोहराचे गुच्छ काळपट झाले, तर काही ठिकाणी लहान फळे गळून पडली. आंबा पीक आंबा बागांची देखभाल ही वर्षभराची प्रक्रिया असते. छाटणी, खत व्यवस्थापन, कीडनियंत्रण, पाणी व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. मोहरापासून फलधारणेपर्यंतचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच काळात हवामानाचा अयोग्य परिणाम झाल्यास संपूर्ण उत्पादनावर परिणाम होतो. सध्या तालुक्यातील अनेक बागांमध्ये जवळपास सर्वच मोहर करपल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे यंदा आंबा उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकूणच, यंदाच्या हंगामात आंब्याच्या मोहराला आलेल्या फटक्यामुळे खालापूर तालुक्यातील बागायतदार आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. हवामानातील अनिश्चितता आणि कीडप्रादुर्भाव यांचा दुहेरी परिणाम सहन करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा हंगाम आव्हानात्मक ठरत आहे. पुढील काही आठवड्यांतील हवामानस्थितीवर उर्वरित उत्पादनाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. प्रशासनाकडून बागांची पाहणी खालापूर परिसरातील बागायतदारांनी हवामानातील बदलामुळे झालेल्या नुकसानीची माहिती कृषी विभागाला दिली आहे. शास्त्रज्ञांनी काही बागांची पाहणी केली असून, थंडी आणि धुक्याच्या प्रभावामुळे मोहोर काळवंडल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले जाते. औषधी फवारणी केल्यास परिणाम दिसून येण्यासाठी काही कालावधी लागतो, तातडीने बदल जाणवत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. “बदलत्या हवामानामुळे थंडी तसेच धुक्याचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे मोहोराचे घोस काळे पडले आहेत. काही बागांची पाहणी करण्यात आली आहे. फवारणी केल्यास तातडीने परिणाम दिसत नसला तरी शेतकऱ्यांनी शिफारशीनुसार उपाययोजना कराव्यात. शासनाला झालेल्या नुकसानीबाबत कळविण्यात आले असून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.” – सुनील निंबाळकर, तालुका कृषी अधिकारी “हवामान बदलामुळे आंबा पिकाच्या झालेल्या नुकसानाबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच आंबा बागांचे पंचनामे प्रशासनाने लवकरात लवकर करावेत.” – मंगेश धामणसे, शेतकरी, खानाव