Khalapur News: सिडकोच्या कामावर प्रश्नचिन्ह? इरसाळवाडी पुनर्वसनातील घरांना अवघ्या २ वर्षांतच लागली गळती
Khalapur News: सिडकोमार्फत खासगी कंपनीने केलेल्या बांधकामाची लक्तरे वेशीवर; अल्पावधीत कौतुक झालेल्या प्रकल्पाबाबत आता तीव्र संताप.

Khalapur News – १९ जुलै २०२३ रोजी इरसाळवाडी येथे झालेल्या भीषण दरड दुर्घटनेत ८४ आदिवासींचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर शासनाने नानिवली परिसरात ४४ पुनर्वसित कुटुंबांसाठी पक्की घरे उभारून दिली. मात्र अवघ्या दोन वर्षांतच या घरांच्या छतांमधून गळती सुरू झाली असून भिंतींनाही तडे गेल्याने पुनर्वसित कुटुंबांपुढे पुन्हा एकदा गंभीर संकट उभे ठाकले आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे अनेक घरांच्या छतांतून पाणी गळत असून भिंतींमधून पाझर फुटल्याने घरांमध्ये पाणी साचत आहे. नुकतीच संसाराची घडी बसविणाऱ्या कुटुंबांना आता पुन्हा दुरुस्तीसाठी शासनाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पुनर्वसन प्रकल्पाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. १९ जुलै २०२३ च्या मध्यरात्री मुसळधार पावसामुळे इरसाळवाडी गावावर दरड कोसळून अनेक घरे मातीखाली गाडली गेली होती. या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते.
त्यानंतर बाधित कुटुंबांचे प्रथम तात्पुरते पुनर्वसन चौक परिसरात करण्यात आले. पुढे राज्य शासनाच्या निर्णयानुसार नानिवलीजवळील साडेसहा एकर शासकीय जागेवर कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाची अंमलबजावणी सिडकोमार्फत करण्यात आली होती. तर बांधकामाची जबाबदारी एका खासगी कंपनीकडे देण्यात आली होती.
अल्पावधीत घरे पूर्ण झाल्याने त्यावेळी कामाचे कौतुक झाले होते. मात्र आता दोन वर्षांतच घरांना गळती आणि तडे गेल्याने या बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहेत. दुर्घटनेच्या तिसऱ्या स्मृतिदिनी पुनर्वसित कुटुंबांनी घरांची तातडीने दुरुस्ती करावी, निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

