Kerala Flood : केरळमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, 18 हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर
Kerala Flood : केरळमध्ये मुसळधार पावसामुळे 25 जणांचा मृत्यू झाला असून 18 हजारांहून अधिक नागरिकांना 400 पेक्षा जास्त मदत छावण्यांमध्ये हलविण्यात आले आहे. आठ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अनेक धरणे धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहेत.

Kerala Flood : केरळमध्ये 1 ऑगस्टपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने राज्यात आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय चार जण बेपत्ता, तर 10 जण जखमी झाले आहेत. पूरस्थिती आणि पाणी साचल्यामुळे 18 हजारांहून अधिक नागरिकांना 400 पेक्षा जास्त मदत छावण्यांमध्ये हलविण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून गेल्या चार दिवसांत केरळमध्ये सरासरीपेक्षा सुमारे तीनपट अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून अनेक सखल भाग जलमय झाले आहेत.
3 जिल्ह्यांना सर्वाधिक फटका ?
राज्य सरकारच्या माहितीनुसार, 1 ते 4 ऑगस्ट या कालावधीत 52 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून 565 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे.
मदत छावण्यांमध्ये दाखल करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये सर्वाधिक संख्या पथानामथिट्टा (7,852), कोट्टायम (5,288) आणि अलप्पुझा (2,651) या जिल्ह्यांतील आहे. पूरपाण्यामुळे अनेक कुटुंबांची महत्त्वाची कागदपत्रे तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक पुस्तके आणि साहित्यही खराब झाले आहे.
आठ जिल्ह्यांना रेड अलर्ट –
भारतीय हवामान विभागाने पथानामथिट्टा, कोट्टायम, इडुक्की, एर्नाकुलम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
याशिवाय अलप्पुझा, त्रिशूर, पलक्कड आणि मलप्पुरम जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर तिरुवनंतपुरम आणि कोल्लम जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. पुढील 24 तासांतही अनेक भागांत अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पाणीपातळी इशारा पातळीच्या वर –
सततच्या पावसामुळे मुवट्टुपुझा आणि थोडुपुझा नद्यांची पाणीपातळी इशारा पातळीच्या वर गेली होती. नंतर त्यामध्ये काहीशी घट झाली असली तरी प्रशासनाने सतर्कता कायम ठेवली आहे.
दरम्यान, मूझियार, कल्लारकुट्टी, एराट्टयार, लोअर पेरियार, पोरिंगलकुथु आणि कुट्टियाडी ही प्रमुख धरणे रेड अलर्ट पातळीवर पोहोचली आहेत. नदीकाठच्या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सरकारकडून मदत आणि पुनर्वसनाला गती
पूरग्रस्त कुटुंबांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले आहे. पुरामध्ये नष्ट झालेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी विशेष न्यायालयांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय प्रत्येक वॉर्डमधील स्वच्छता मोहिमेसाठी 25 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून स्वयंसेवी संस्थाही प्रशासनासोबत मदत व स्वच्छता अभियानात सहभागी झाल्या आहेत. प्रशासनाकडून पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





