केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी अमित शहांचा ‘तो’ दावा फेटाळला, म्हणाले….

तिरुअनंतपुरम- केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दाव्याचे खंडन केले. अतिवृष्टीमुळे वायनाडमध्ये संभाव्य नैसर्गिक आपत्तीबाबत राज्य सरकारला २३ जुलैला इशारा देण्यात आला होता असे अमित शहा यांनी म्हटले होते. ते विजयन यांनी फेटाळून लावले आहे.
विजयन म्हणाले की, भारतीय हवामान खात्याने भूस्खलनापूर्वी जिल्ह्यात फक्त ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तथापि, जिल्ह्यात 500 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, जो हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा खूपच जास्त होता. मंगळवारी सकाळी भूस्खलन झाल्यानंतरच जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता.
शहांनी दावा केला की केरळ सरकारने पूर्व चेतावनीकडे लक्ष दिले नाही आणि राज्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) बटालियनच्या आगमनानंतरही सतर्क झाले नाही. 30 जुलैच्या भूस्खलनाच्या सात दिवस अगोदर राज्याला पूर्व चेतावनी पाठवण्यात आली होती.
24 जुलै रोजी आणखी एक इशारा देण्यात आला. केरळ सरकार स्वत: सतर्क झाले असते आणि एनडीआरएफचे पथक तेथे पोहोचताच कारवाई केली असती, तर नुकसान कमी करता आले असते, असा शाह यांनी राज्यसभेत दावा केला. मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की ही वेळ ब्लेम गेम ची नाही आणि ते शहा यांच्या टीकेला विरोधक पद्धतीने घेत नाहीत.





