Kavita Medhekar : ‘चार दिवस सासूचे’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘उंच माझा झोका’ अशा अनेक मालिकांतून, तसेच विविध नाटक व चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ‘कविता मेढेकर’. सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत भुवनेश्वरीची भूमिका साकारत आहेत. सिनेविश्वातील एक गुणी अभिनेत्री म्हणून कविता मेढेकर यांची ओळख आहे. गंभीर ते विनोदी अशा अनेक भूमिका आजवर त्यांनी साकारल्या आहेत. आणि त्यामुळेच कविता यांची स्वतःची एक वेगळी ओळख मराठी इंडस्ट्रीमध्ये बनवली आहे. पण तुम्हाला माहितीये का अभिनयविश्वात येण्यापूर्वी कविता यांच्या वडिलांनी त्यांना दोन अटी घातल्या होत्या. स्वतः अभिनेत्रीने याबद्दल खुलासा केला आहे. नुकताच एका मुलाखतीत कविता यांनी यावर भाष्य केलं आहे. कलाविश्वात येण्यापूर्वी घरच्यांनी आपल्याला कोणत्या गोष्टी सांगितल्या होत्या याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. अभिनेत्री कविता यांनी नुकतंच एका युट्युब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहे. जेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितलं की, मला नाटकात काम करायचं आहे. त्यावेळी माझ्या बाबांचं सरळ, स्पष्ट मत होतं की, चांगल्या घरातील मुली नाटक, सिनेमा यांत काम करीत नाही. माझे वडील खूप कडक शिस्तीचे होते, वर्चस्व गाजवणारे होते, असंही काही नव्हतं. त्याही वेळेस मला कळत होतं की, ते जे बोलत आहेत ते सगळं माझ्या काळजीपोटी आहे. पण त्यानंतर मी वडिलांची परवानगी घेतली. परवानगी देण्यापूर्वी त्यांनी मला दोन अटी घातल्या. त्यांची पहिली अट अशी होती की, कोणत्याही प्रकारचा पोर्टफोलिओ शूट करायचा आणि दारोदार ते फोटो घेऊन हिंडायचं नाही. दुसरी अट म्हणजे, काहीही झालं तरी दारू, सिगारेटला हात लावायचा नाही. तेव्हा खूप चर्चा असायच्या. पण त्यांची ती अटसुद्धा मी मान्य केली. माझा माझ्या वडिलांवर आंधळा विश्वास होता. ते जे म्हणतील ते योग्यच असेल असं मला वाटायचं आणि आता माझ्या मुलांनी माझ्यावर असा विश्वास ठेवावा असं मला वाटतं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या कविता मेढेकर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेच्या माध्यमातून रसिकप्रेक्षकांना भेटत आहेत. या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता हृषिकेश शेलार यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. कोल्हापुरात होणाऱ्या या मालिकेचं लेखन केलंय मधुगंधा कुलकर्णी हिने तर मालिकेचे दिग्दर्शक आहेत चंद्रकांत गायकवाड याने. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली असून, मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत आहे.