महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात काल (१७ ऑक्टोबर २०२५) ओबीसी समाजाच्या महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला राज्याचे मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. ही सभा ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि राजकीय मुद्द्यांवर केंद्रित होती. मात्र, या सभेवर प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आणि काही अत्यंत गंभीर आरोप केले. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून, सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा होत आहे. करुणा शर्मा यांनी सभेनंतर बोलताना धनंजय मुंडे यांच्या राजकीय इतिहासावर आणि कथित अन्यायांवर टीका केली. त्या म्हणाल्या, “धनंजय मुंडे यांच्याविरोधात मी उभी राहिले होते, पण माझा अर्ज रद्द करण्यात आला. कोण किती पाण्यात आहे, त्यावेळी कळलं असतं. समाजाच्या लोकांना हे लोक न्याय देऊ शकत नाहीत. हे स्वत:ची राजकीय पोळी भाजत आहेत. हे म्हणतात ‘आमच्या ताटातलं घेऊ नका’, मात्र तुम्ही मंत्री असताना लोकांचं ताट हिरावून घेतलं. तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या.” त्या पुढे म्हणाल्या, “मी जोपर्यंत आहे तोपर्यंत समाजाचे खच्चीकरण होऊ देणार नाही. जीआर कळतो का? असे धनंजय मुंडे म्हणतात, मात्र त्यांना कळतो का? असा सवाल मी विचारते.” या सभेनंतर करुणा शर्मा यांनी केलेले आरोप अधिक गंभीर स्वरूपाचे होते. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर खळबळजनक आरोप केले. त्या म्हणाल्या, “तुम्ही कसा न्याय देणार? माझी आई मनोरमा शर्मा, माझा ड्रायव्हर यांचे मर्डर केले. माझ्या बहिणीवर बलात्कार केला. स्वतःच्या बायकोला न्याय देता आला नाही, तो समाजाला काय न्याय देणार? तुम्ही आधी साखर कारखान्याच्या जमिनी द्या. माझ्या आईने यांच्या दबावात आत्महत्या केली, माझ्या बहिणीने सांगितले नंतर मला कळालं.” या आरोपांनी सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात धक्कादायक परिणाम झाला असून, ओबीसी समाजातील नेत्यांमध्येही यावर चर्चा सुरू झाली आहे. करुणा शर्मा यांनी पुढे न्याय मागण्याच्या प्रयत्नांबद्दलही सांगितले. त्या म्हणाल्या, “दरम्यान चार-पाच दिवस आधी मी जरांगे यांची भेट घेऊन न्याय मागितला, त्यांनी घरगुती मॅटरमध्ये पडत नाही असं मला सांगितलं.” त्या पुढे म्हणाल्या, “यांची भाषणं दिशाभूल करणारी आहेत. त्यांच्या सभा झाल्यानंतर मी बोलत आहे. मी जनतेला प्रश्न विचारते, मला वाल्मीक कराडने जिल्हाधिकारी कार्यालयातच मारले, हे सर्वांना माहीत आहे. माझ्यावर वेगवेगळ्या केसेस केल्या, माझी बहीण काय न्याय मागणार? ती इंदौरला निघून गेली. तीला पाठिंबा मिळाला तर ती पण बोलेल. निवडणूक आली तर यांना समाज दिसतो.” असे करुणा मुंडे म्हणाल्या.