Karjat Shirur Highway : कर्जत-शिरूर चौपदरीकरणावर शेतकरी एकवटले! ‘या’ एका मागणीसाठी समितीची मोठी बैठक
Karjat Shirur Highway : भूसंपादन प्रक्रियेत स्थानिक शेतकरी मालकांवर अन्याय होऊ नये म्हणून पाबळ येथे 'कर्जत शिरूर महामार्ग समन्वय समिती'ची स्थापना.

Karjat Shirur Highway – पुणे जिल्ह्यासह मराठवाडा, अहिल्यानगर व पुणे परिसराला थेट मुंबईशी जोडणाऱ्या बहुचर्चित कर्जत शिरूर चौपदरी महामार्गाला राज्य शासनाची मंजुरी मिळताच आता या महामार्गावरील शेतकरी संघटित झाले आहेत. महामार्गाचे काम तातडीने सुरू व्हावे तसेच भूसंपादन प्रक्रियेत शेतजमीन मालकांवर अन्याय होऊ नये व विकासाच्या प्रक्रियेत स्थानिकांचा सहभाग राहावा या उद्देशाने कर्जत शिरूर महामार्ग समन्वय समिती स्थापन केली आहे.
समितीची पहिली बैठक चर्चा, समन्वयातून पार पडली. पाबळ (ता. शिरुर) येथे नुकतीच कर्जत शिरूर महामार्ग समन्वय समितीची बैठक पार पडली. यावेळी अॅड. हर्षल गोसावी, राज गायकवाड, दादा पाटील घावटे, चंद्रशेखर वारघडे, बाबा इनामदार, बंटी शेळके, रमेश दौंडकर, परिसरातील शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, राज्य शासनाने (दि.७) मे रोजी रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या १३३.७१५ किलोमीटर लांबीच्या चौपदरी महामार्गास मंजुरी दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील नेरळ (बदलापूर मार्ग) येथून सुरू होणारा हा महामार्ग वांद्रे, पाईट, शिरोली, पाबळ, मलठणमार्गे शिरूर येथे पुणे ते अहमदनगर महामार्गाला जोडला जाणार आहे. महामार्गासाठी १२२० कोटी रुपयांच्या भूसंपादनास मंजुरी दिली असून प्रकल्प पीपीपी ( Public Private Partnership ) तत्त्वावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येणार आहे.
प्रकल्पात गुंतवणूक करणाऱ्या सवलतदारास शासनाच्या टोल धोरणानुसार पथकर वसुलीचे अधिकारही देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग परिसरातील गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येत समन्वय समिती स्थापन केली. बैठकीत पुणे नाशिक महामार्ग समन्वयक दिलीप मेदगे यांनी प्रकल्पाची माहिती देताना शेतकऱ्यांनी विकासाला विरोध नव्हे तर न्याय्य सहभागाची भूमिका घ्यावी,
असे आवाहन करीत हा मार्ग केवळ वाहतुकीचा पर्याय नाही तर मलठण पाबळ, पाईट वांद्रे परिसरासाठी विकासाची नवी दारे उघडणारा ठरणार आहे. मात्र, काम सुरू होण्यापूर्वीच शेतकरी संघटित होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतीमाल निर्यातीसाठी दुवा
कर्जत- शिरूर महामार्गामुळे पुणे शहरावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून मराठवाडा, अहिल्यानगर व शिरूर औद्योगिक पट्ट्याला मुंबई व जेएनपीटी बंदराशी थेट आणि जलद संपर्क मिळणार आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमाल आणि औद्योगिक उत्पादनाच्या निर्यातीसाठी हा महामार्ग दुवा ठरणार आहे.






