Kaas Lake Accident : धक्कादायक! १० वर्षे गाळच काढला नाही; कास तलावात पर्यटकांसाठी लपलाय ‘हा’ मोठा धोका
Kaas Lake Accident : सातारा शहरासह १६ गावांची तहान भागवणाऱ्या कास तलावात गेल्या १० वर्षांपासून गाळ साचल्याने अपघातांचा धोका वाढला.

Kaas Lake Accident – सातारा शहरासह परिसरातील 16 गावांची तहान भागवणारा कास तलाव परिसर केवळ पर्यटनस्थळ नसून, हे धरण सातार्याची जीवनवाहिनी मानले जाते. सुमारे 12 मीटर उंची आणि जवळपास अर्धा टीएमसी पाणीसाठा असलेल्या या जलाशयात रविवारी (दि. 31) घडलेल्या दुर्घटनेमुळे या परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वनवासवाडी येथील एकाचा कास तलावात बुडून मृत्यू झाला. जुन्या बंगल्याजवळील गाळ साचलेल्या भागात तोल जाऊन ही दुर्घटना घडली. या घटनेने पर्यटकांचा बेजबाबदारपणा आणि तलाव परिसरातील सुरक्षेतील त्रुटी अधोरेखित झाल्या आहेत. या ठिकाणी सातारा पालिकेने दोन नळकरी आणि सहा सुरक्षारक्षकांची नेमणूक केली असली, तरी कास तलाव परिसर मोठा आहे.
तलावाच्या काठाला अनेक ठिकाणी दाट झाडी, पाण्यालगतच्या अरुंद वाटा आणि दुर्गम भागामुळे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवणे आव्हानात्मक आहे. गेल्या दहा वर्षांत तलावातील गाळ उपसण्यात आला नसल्याने, काही भागात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पाण्याची खोली आणि तलावातील गाळ याची माहिती नसल्याने पर्यटक धोकादायक भागात उतरतात. त्यामुळे दुर्घटनांची शक्यता वाढत आहे.
याशिवाय कास तलाव हा सातारा शहराच्या मोठ्या लोकसंख्येचा पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. पर्यटकांच्या वावरामुळे प्रदूषणाचाही प्रश्न गंभीर आहे. आरोग्य विभागाकडून दरवर्षी दोन ते तीन टन कचरा या परिसरातून संकलित केला जातो. प्लॅस्टिक, दारूच्या बाटल्या आणि इतर घनकचर्यामुळे जलस्रोताच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती आहे. तज्ज्ञांच्या मते, कास धरण परिसरात सुरक्षित पर्यटन आणि जलस्रोत संवर्धन यांचा समतोल राखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.





