Kaas Lake Satara – शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कास तलावामध्ये सध्या ४४ फूट पाणीसाठा उपलब्ध असून उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याची पातळी कमी होत असली तरी नागरिकांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नसल्याचे स्पष्टीकरण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आले आहे. कास धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर २०२३ पासून धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पूर्वी धरणात सुमारे ६१.०४८ फूट इतकाच पाणीसाठा होत होता. त्यामध्ये मृत पाणीसाठा धरुन एकूण ७८.७२० फूट क्षमतेचा साठा उपलब्ध राहत असे. मात्र, धरणाची उंची तब्बल १२ मीटरने वाढविण्यात आल्याने आता धरणाच्या तळापासूनच पाणी साठविण्याची क्षमता निर्माण झाली आहे. परिणामी, गेल्या दोन वर्षांपासून कास तलावात सुमारे ११३४ घनफूट इतका मोठा पाणीसाठा साठवला जात असून हा साठा जुन्या धरणाच्या तुलनेत जवळपास पाचपट अधिक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याची पातळी दररोज अर्धा ते एक फूटाने घटत आहे. पूर्वी एप्रिल- मे महिन्यात धरणातील पाणीसाठा अत्यल्प होत असे. मात्र, नव्या वाढीव क्षमतेमुळे गेल्या दोन वर्षांत पाणीसाठा तुलनेने स्थिर राहत आहे. सध्या पाण्याची पातळी सुमारे १७ फूटाने खाली गेली असली तरी धरणात अद्याप ४४ फूट पाणीसाठा उपलब्ध असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही तातडीचा परिणाम होणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, कास तलाव परिसरात सायंकाळच्या वेळी पर्यटकांची मोठी गर्दी होत असून धरणाच्या भिंतीजवळ नागरिक आणि पर्यटक निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना दिसत आहेत.