‘सत्ता हवी असताना, ते मंदिर-मंदिर करत होते’, मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून शंकराचार्यांनी साधला निशाणा

Jyotishpeeth Shankaracharya on Mohan Bhagwat: सत्ता हवी होती, तेव्हा मंदिर-मंदिर करत होते. आता सत्ता मिळाल्यानंतर मंदिर न शोधण्याचा सल्ला देत आहेत, अशा शब्दात उत्तराखंड ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे.
प्रत्येक ठिकाणी मंदिर शोधण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे वक्तव्य भागवत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी भागवत यांच्यावर राजकीय सोयीनुसार वक्तव्य करत असल्याचाही आरोप केला आहे.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, त्यांच्याकडे आता सत्ता आल्याने ते मंदिर न शोधण्याचा सल्ला देत आहेत. भूतकाळात आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची यादी तयार करावी आणि हिंदू गौरव परत मिळवण्यासाठी वास्तूंचे पुरातत्व सर्वेक्षण केले जावे. भूतकाळात हिंदूंवर अत्याचार झाले आहेत. त्यांची धार्मिक स्थळे नष्ट करण्यात आली. जर आता हिंदू समाजाला आपल्या मंदिरांचे जीर्णोद्धार आणि जतन करायचे असेल तर त्यात चुकीचे काय? असा प्रश्न त्यांनी केला.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी बांगलादेशात होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराचाही निषेध केला. सरकारने याबाबत कठोर पावले उचलावी व भारतात बेकायदेशीररित्या राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांना परत पाठवावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मंदिरांबाबत काय म्हणाले होते मोहन भागवत?
धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती झाली. ती योग्यच आहे. मात्र, मंदिराची निर्मिती होते आहे, म्हणून कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही. राम मंदिराची निर्मिती झाली, कारण तो हिंदूंच्या श्रध्देचा विषय होता. दररोज एक नवीन प्रकरण समोर आणले जात आहे. याची परवानगी कशी दिली जाऊ शकते? हे पुढे सुरू राहू शकत नाही. भारताने सर्वजण सोबत राहू शकतात, हे दाखवण्याची गरज आहे, असे मत मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले होते.





