गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई : न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणाचा पुन्हा नव्यान तपास करण्यात येणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी माहिती दिली. न्या. लोयाप्रकरणी ठोस पुरावे नसल्याचे महत्त्वाचे वक्तव्य अनिल देशमुख यांनी केले आहे. ‘अनेक लोकांनी मला फोन करुन त्यांच्याकडे नवीन पुरावे असल्याचा दावा केला. मी त्यांना माझ्याकडे या आणि पुरावे द्या असे म्हटले होते. पण एकही ठोस पुरावा समोर आला नाही.’ देशमुख यांनी यापूर्वी त्यांच्याकडे ठोस पुरावे आल्यास या प्रकरणाची पुन्हा चौकशी करु असे म्हटले होते.
गुजरातच्या सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी करत असलेले न्या. लोया यांचा 1 डिसेंबर 2014 रोजी नागपूरमध्ये ह्दयविकाराने मृत्यू झाला होता. ते आपल्या मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी नागपूरला आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान काही दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.एच.लोया यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. याप्रकरणी स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर महाराष्ट्र सरकारला उत्तर देण्यास सांगण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिवंगत न्यायमूर्तींचा शवविच्छेदन अहवाल मागितला होता.
न्या. लोया यांच्या बहिणीच्या हवाल्याने माध्यमात त्यांचा मृत्यू आणि सोहराबुद्दीनशी निगडीत परिस्थितीवर संशय व्यक्त करणारे वृत्त आले होते. गुजरातमध्ये सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी कौसर बी आणि त्याचा सहकारी तुलसीदास प्रजापतीचा नोव्हेंबर 2005 मध्ये झालेल्या बनावट चकमकीत मृत्यूप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांसह एकून 23 आरोपींना न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे लागले होते. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने 8 जानेवारी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करुन न्यायधीशांच्या मृत्यूची चौकशीची मागणी केली होती.