Narhari Zirwal On Raj Thackeray : ‘डबल जाळी लावून उडी मारा…’; राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला नरहरी झिरवळ यांचं जोरदार प्रत्युत्तर

Narhari Zirwal On Raj Thackeray – विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सोमवारी मंत्रालयातील आंदोलनाच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली टीका फेटाळून लावली. ‘मी जाळी नसलेल्या इमारतीहूनही उडी मारू शकतो.
पण ज्यांना माझ्यासारखा प्रयोग करायचा आहे, त्यांनी डबल जाळी लावून उडी मारावी’, असे ते राज ठाकरे यांचे नाव न घेता म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी आपली शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नसल्याचेही स्पष्ट केले.
झिरवळ यांच्या नेतृत्वात गत आठवड्यात आदिवासी आमदारांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या होत्या.
या आंदोलनाद्वारे त्यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्यास विरोध केला होता. विधानसभेच्या उपाध्यक्षांनीच मंत्रालयावरून उडी मारल्यामुळे या आंदोलनाची देश पातळीवर दखल घेतली गेली.
मुख्यमंत्र्यांना भेटून जाब विचारणार !
नरहरी झिरवळ यांनी यावेळी धनगड नावाने जारी करण्यात आलेले जातीचे दाखले रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्याचेही संकेत दिले आहेत. आम्ही आदिवासींचे बोगस दाखले रद्द करण्याची मागणी केली होती.
पण तेव्हा सरकारने हे आपल्या अधिकारक्षेत्रात नसल्यांचा दावा करत हात झटकले होते. मग आता त्यांनी हा निर्णय कसा घेतला? या प्रकरणी उद्याच मुख्यमंत्र्यांना भेटून मी जाब विचारणार आहे, असे ते म्हणाले होते.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
पुण्यात मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण आज करण्यात आलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्राची सर्कस झाली आहे, असे म्हणत कोणी विदुषकी चाळे करत आहे, कुणी मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या मारत आहेत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे नरहरी झिरवळ यांच्यावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले.
तर राज्यात कित्येक लोक राजकारणात अशी आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरून उड्या मारायला लावल्या पाहिजे, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी करत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून भाष्य केले.
ही बातमी नक्की वाचा….
‘मी आधी आदिवासी नंतर..’ मंत्रालयाच्या जाळीवर उडी घेतल्यानंतर नरहरी झिरवळ झाले,’भावूक’





