‘हम दो हमारे बारह’ सिनेमावरुन वाद; जितेंद्र आव्हाड भडकले, म्हणाले, ‘मुसलमानाच्या घरात दहा पोर असल्याचं दाखवा…’

Jitendra Awhad | Hum Do Hamare Baarah | Annu Kapoor : अभिनेते अन्नू कपूर यांचा आगामी ‘हम दो हमारे बारह’ चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाला काही धार्मिक संघटनांनकडून विरोध करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ‘हम दो हमारे बारह’ 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर झाल्यानंतर 7 जून रोजी रिलीज होणार आहे.
मात्र, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर रझा अकादमीकडून विरोध करण्यात आला होता. सध्या चित्रपटाला वेगवेगळ्या ठिकाणांहून विरोध होत असताना चित्रपटातील कलाकारांना एका अज्ञाताकडून धमकीचा फोन आला असल्याची माहिती खुद्द अभिनेता अन्नू कपूरने दिलेली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या टीमसह दिग्दर्शकांनी मुंबई पोलिसांत धाव घेतली आहे.
धार्मिक भावना दुखवणारे काही सीन्स टीझरमध्ये दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या चित्रपटाला धार्मिक संघटनेकडून विरोध केला जात आहे. सोशल मीडियावरून टीझर आणि ट्रेलरही त्वरित डिलीट करण्यात यावा, अशी मागणी रझा अकादमीचे सदस्य सईद नुरी आणि माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी केली आहे.
दरम्यान, सिनेमावरून निर्माण झालेल्या या वादावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘मला एक कुटुंब असं दाखवावं की ज्यामध्ये 10 मुलं आहेत, मी त्यांना 11 लाख रुपये द्यायला तयार आहे’, असं आव्हाडांनी म्हटलं.
‘आपल्याकडे एक नवीन पद्धत सुरु झालीये, चित्रपटाच्या माध्यमातून चुकीचं आणायचं आणि त्याचा गवगवा करायचा. आधीच्या चित्रपटात सामाजिक भावना, एकता, प्रेम दाखवलं जायचं. केरला चित्रपट तीन दिवसात काढावा लागला कारण लोकांमध्ये जागृती आलीये. महिलांविषयी गैसमज पसरवले गेलेत, किती मुलं असावी याबाबत चुकीचं दाखवलं गेलंय.समाजात वितुष्ट यावं हे भारताच्या हिताचं नाही, फक्त राजकारणासाठी जातीय द्वेष पसरवला जात आहे.’ असं ते यावेळी म्हणाले.
पुढे त्यांनी म्हटलं की, ‘एका मुसलमानाच्या घरात दहा पोर असल्याचं दाखवा, कोणत्या धर्माच्या पुस्तकात लिहिलं गेलं आहे की संतान किती असावं. सेन्सर बोर्डाने लक्ष घालन गरजेचं. चित्रपट समाजाला एकत्र आणण्यासाठी काढला जावा. दावते इस्लामी नावाच्या बॅनरचा वापर केला गेलाय त्यांची परवानगी न घेता तो चित्रपटात दाखवण्यात आला असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
चित्रपटाबद्दल सांगायचे तर, चित्रपटाचे दिग्दर्शन कमल चंद्रा यांनी केले असून चित्रपट येत्या 7 जून रोजी चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, अन्नू कपूर, पार्थ समथान, आश्विनी कळसेकर, मनोज जोशी, पारितोष त्रिपाठी, राहूल बग्गा सह अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.





