वाई – देशसेवेचे कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले आसले, ता. वाई गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सहकार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, माजी आमदार मदन भोसले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार रणजीत भोसले, पंचायत समिती सभापती संगीता चव्हाण, लष्करी व पोलीस अधिकाऱ्यांनी हुतात्मा सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.
फुलांनी सजवलेल्या लष्करी वाहनात हुतात्मा मांढरे यांचे पार्थिव ठेवून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. मार्गावर सडारांगोळ्या काढण्यात आला होता. अंत्ययात्रेत मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता. “अमर रहे अमर रहे सोमनाथ मांढरे अमर रहे’, “भारतमाता की जय,’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. पोलीस व सैन्यदलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बॅंड पथकाने बिगुल वाजवून हुतात्मा मांढरे यांना अखेरची मानवंदना दिली. त्यानंतर पत्नी प्रियंका, मुलगा यश (वय 8 वर्षे) व मुलगी आराध्या (वय 10 महिने), भाऊ राहुल यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. यशने पार्थिवाला अग्नी दिला. मांढरे हे लडाख येथे कार्यरत होते.
हवामानात झालेल्या अचानक बदलांमुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याची माहिती सायंकाळी उशिरा कुटुंबीयांना प्रशासनाकडून कळविण्यात आली. त्यांच्या वीरमरणाची माहिती समजताच आसले गावासह संपूर्ण वाई तालुका शोकसागरात बुडाला. वाई तालुक्यातील बावधननजीक अनपटवाडी हे मांढरे कुटुंबीयांचे मूळ गाव आहे.