Jasmine Sandlas: “आधार नव्हता, म्हणून चुकले…”, जैस्मीन सॅंडलसची कबुली
Jasmine Sandlas जैस्मीन म्हणाल्या की, त्यांचे बालपण आणि तारुण्य सोपे नव्हते. “मी आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. अनेक वेळा मला स्वतःच निर्णय घ्यावे लागले. योग्य मार्गदर्शन आणि आधार मिळणे खूप महत्त्वाचे असते, पण ते नेहमीच मिळाले नाही,” असे त्यांनी सांगितले.

Jasmine Sandlas: पंजाबी आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका जैस्मीन सॅंडलस सध्या त्यांच्या गाण्यांमुळे चर्चेत आहेत. ‘धुरंधर २’ चित्रपटातील त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. विशेषतः ‘जाईये सजना’ हे गाणे खूप गाजले आणि त्यांचा लाईव्ह परफॉर्मन्सही सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, या यशामागे त्यांनी मोठा संघर्ष अनुभवला आहे. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल मोकळेपणाने सांगितले.
जैस्मीन म्हणाल्या की, त्यांचे बालपण आणि तारुण्य सोपे नव्हते. “मी आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. अनेक वेळा मला स्वतःच निर्णय घ्यावे लागले. योग्य मार्गदर्शन आणि आधार मिळणे खूप महत्त्वाचे असते, पण ते नेहमीच मिळाले नाही,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी पालकांबद्दल बोलताना सांगितले की, कधी कधी पालकांच्या कठोर वागण्यामुळे मुलांना त्रास होतो. “माझ्या आई-वडिलांनीही नकळत माझे मन दुखावले. त्यामुळे मनात थोडी नाराजी आहे, पण त्यांच्यावर प्रेमही आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Jasmine Sandlas
त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एका कठीण टप्प्याबद्दलही सांगितले. “एक काळ असा होता, जेव्हा मी जास्त दारू प्यायले. त्या वेळी माझ्या आयुष्यात खूप गोष्टी एकाच वेळी घडत होत्या. एका बाजूला मी प्रसिद्ध होत होते, तर दुसऱ्या बाजूला कुटुंबात समस्या होत्या. माझ्या वडिलांचे निधन झाले होते, आणि मी मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ होते,” असे त्यांनी सांगितले. त्या काळातील काही निर्णयांबद्दल त्यांना आजही खंत वाटते.
जैस्मीन पुढे म्हणाल्या की, प्रत्येकाला आयुष्यात एक सुरक्षित जागा हवी असते, जिथे आपण मन मोकळे करू शकतो. “जेव्हा अशी जागा नसते, तेव्हा माणूस सगळीकडे आपलेपण शोधत फिरतो. मीही आयुष्यभर तेच करत राहिले,” असे त्यांनी भावनिकपणे सांगितले.
जैस्मीन सॅंडलस यांचा जन्म पंजाबमधील जालंधर येथे झाला. त्या पुढे अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये वाढल्या. त्यांनी २००८ साली ‘मुस्कान’ या गाण्याने करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी बोहेमिया यांच्यासोबत काम केले. २०१४ मध्ये ‘किक’ चित्रपटातील ‘यार ना मिले’ या गाण्यामुळे त्यांना मोठी ओळख मिळाली. या गाण्यात त्यांनी प्रसिद्ध गायक हनी सिंगसोबत काम केले होते.
आज त्या यशस्वी गायिका असल्या तरी त्यांच्या संघर्षाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.





