Devendra Fadnavis : जरांगेंनी एका दिवसात उपोषण मागे घेतलं; आता CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर
Devendra Fadnavis : जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया दिली.

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर मनोज जरांगे यांनी मागे घेतले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शुक्रवारी सकाळी सुरू झालेले उपोषण सरकारसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मध्यरात्री थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यरात्री १.१५ वाजता पाणी पिऊन मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले.
मराठा आरक्षण अभ्यासक आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेत अनेक मुद्द्यांवर सहमती झाल्याचे सांगितले जात आहे. अभ्यासकांनी सुचवलेल्या दुरुस्त्या सरकारने मान्य केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांची भेट घेतली. यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय झाला.
जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया दिली. “मनोज जरांगे पाटील यांना दिलेली सर्व आश्वासने पारदर्शकपणे आणि माध्यमांसमोर दिली आहेत. कोणतीही गुप्त चर्चा किंवा आश्वासन देण्यात आलेले नाही. मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका सरकारने सातत्याने घेतली असून त्यानुसारच कार्यवाही सुरू आहे,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : Khalnayak Returns : ‘खलनायक रिटर्न्स’मध्ये तब्बल 33 वर्षांनंतर संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ दिसणार एकत्र
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी “मनोज जरांगे यांनी सुचवलेल्या काही सुधारणा स्वीकारण्यात आल्या असून त्यासंदर्भातील शासन निर्णय पुढील दोन ते तीन दिवसांत जारी केला जाईल,” असे स्पष्ट केले.
दरम्यान, या मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “मनोज जरांगे बिहार चित्रपटातील रीलस्टार आहे. मनोज जरांगेंना राजकारणाचे वेध लागले आहेत.
तसेच हाकेंनी प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावही निशाणा साधला. प्रसाद लाड यांच्या मदतीने त्यांना पक्ष स्थापन करून विजय थलपती व्हायचं आहे. आज महाराष्ट्र सरकार लाचार होताना पहिले. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांना ओबीसी जागा दाखवणार, असा थेट इशाराही दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, मनोज जरांगे यांनी निर्णयासंदर्भात जीआर काढण्यासाठी २ जूनची मुदत दिली आहे. त्यामुळे सरकारकडून जाहीर होणाऱ्या पुढील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ई-केवायसीनंतर तब्बल ‘इतक्या’ महिला लाभार्थी ठरल्या अपात्र





