यंत्रणा सतर्क, मंदिर परिसराच्या सुरक्षेत केली वाढ
शिर्डी – शिर्डी व मुंबईसह देशातील चार राज्यातील बसस्थानके व मंदिरे उडवून देण्याची धमकी देणारे पत्र रोहतक रेल्वे अधीक्षक यांना प्राप्त झाल्यामुळे संपूर्ण देशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जागतिक कीर्तीच्या शिर्डी येथील साई मंदिराच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. या यंत्रणेचा सविस्तर आढावा वरिष्ठ स्तरावरून घेण्यात आला आहे.
हे पत्र पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून आल्याची माहिती समोर आली आहे. या पत्राने खळबळ उडवून दिली असून मुंबईसह इतर राज्यात देखील रेल्वे स्थानके आणि मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. हरियाणा राज्यातील रोहतक रेल्वे अधीक्षक यशपाल मीना यांच्या कार्यालयात 14 सप्टेंबर रोजी पोस्टामार्फत एक पत्र आले. हे पत्र पाकिस्तानच्या कराची येथून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद आनारशी यांनी पाठवल्याचे दिसून येत असल्याची मीना यांनी म्हटले आहे.
मुंबई- चेन्नई, बेंगरूळ, राजस्थान, हरियाणा, रोहतक, रेवाडी आणी हिसार या राज्यातील महत्त्वाची 12 रेल्वेस्थानके आणि मंदिरे येथे 8 ऑक्टोबर रोजी बॉम्बने उडवून जैसे मोहम्मद दहशतवाद्यावरील हल्ल्याचा सूड घेण्यात येणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे. अशी माहिती रोतक रेल्वे पोलीस विभागाचे विभागाचे अतिरिक्त पोलीस कुमक यांनी दिली. धमकीच्या पत्र प्रकरणी रोहतक रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिर्डी येथील साईबाबा मंदिर हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र असल्याने येथील सर्व विभागातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत असे उपविभागीय पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले. मंदिर परिसरात सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.