जैन बोर्डिंगचा लढा सुरूच राहणार! व्यवहार कायदेशीररित्या रद्द होत नाही, तोपर्यंत उपोषण कायम- जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शिवाजीनगर येथील जैन बोर्डिंगचा व्यवहार कायदेशीरपणे रद्द होऊन विद्यार्थी बोर्डिंगमध्ये येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी सांगितले. आमची लढाई कोणत्याही पक्षाशी नव्हे, तर भ्रष्टाचाराशी आहे, असे स्पष्ट करत जैन मुनींनी ट्रस्टींना सुनावले.जैन बोर्डिंगचा जमीन व्यवहार रद्द झाला. हा समाजाचा मोठा विजय आहे, असे सांगून जैन मुनींनी पुढची दिशा काय असणार आहे, याविषयी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली.
बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मैत्री काय असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हा करोडोचा व्यवहार होता. मात्र, मैत्रीसाठी करोडोंचा व्यवहार त्यांनी तोडून टाकला. त्यामुळे मैत्रीची नवी परिभाषा त्यांनी कायम केली असून अशी दोस्ती सर्वांची असली पाहिजे, असेही जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी सांगितले. या सर्व प्रकारास ट्रस्टचे काही पदाधिकारी जबाबदार असून, त्यांच्यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे.
तसेच, हा व्यवहार पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यत येत्या १ तारखेपासून होणारे उपोषण सुरुच राहणार असल्याचे ते म्हणाले.उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार अद्याप या प्रकरणामध्ये काही बोललेले नाहीत. याठिकाणी आलेले नाहीत, हे अत्यंत चुकीचे आहे. १७ ऑक्टोबरला काढलेल्या मोर्चापूर्वीच आम्ही पालकमंत्री अजित पवार यांना आमचं म्हणणे पाठवले होते. मात्र त्यांच्यापर्यंत हे सर्व पोहचून देखील ते का आले नाहीत, याबाबत आम्हाला काही कल्पना नाही. या प्रकरणामध्ये अजित पवार यांनी शब्द देखील काढलेला नाही. ते समाजासोबत उभे राहावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.





