Jain Boarding : न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण! डॉ. कल्याण गंगवाल यांचा इशारा, जैन समाजाचा संघर्ष तीव्र

प्रभात वृत्तसेवा
पुणे – जैन बोर्डिंग जमिन विक्री प्रकरणी जैन समाजाला न्याय मिळाला नाही, तर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा शाकाहार विषयाचे प्रणेते डॉ. कल्याण गंगवाल यांनी दिला आहे. ही जमीन फक्त मालमत्ता नाही, ती आपल्या संतांच्या तपश्चर्याने पवित्र झाली आहे. तिचा गैरवापर धर्मसंस्थेच्या वारशावर आघात करणारा असल्याचे गंगवाल म्हणाले.ते म्हणाले, हा संघर्ष अहिंसेच्या मार्गानेच लढला जाईल, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले, तर जैन बोर्डिंग येथे अनिश्चितकाळ उपोषणाला बसणार आहे.
हा लढा केवळ जमिनीचा नाही, तर जैन धर्माच्या आत्म्याचा आहे. सत्याच्या विजयासाठी तो शेवटपर्यंत चालेल. जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करावा, संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि संस्थेचे पुनर्गठन करून नवीन विश्वस्त मंडळाची निवड करावी, या जैन समाजाच्या स्पष्ट मागण्या आहेत. न्याय मिळाल्यास ऐतिहासिक संस्थेचा वारसा सुरक्षित राहील. जैन बोर्डिंग हाऊसमधील भगवान महावीर जिनालयाशी माझा ४० वर्षांचा अतूट संबंध आहे.
भावनिक दृष्ट्या मी त्याच्याशी खोलवर जोडला गेलो असून, हीच भावना प्रत्येक जैन बांधवाची आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रकरणाची दखल घेतली असून, संबंधित दस्तऐवजांची तपासणी सुरू आहे. महापालिकेकडूनही जमीन हस्तांतरण आणि बांधकाम परवानग्यांची चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासात काही अनियमितता आढळल्या असून, कायदेशीर सल्ल्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.





