डॉ. न. म. जोशी : अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या पुरस्काराचे वितरण
पुणे – उघड्या डोळ्यांनी वावरणाऱ्या बालसाहित्यिकांना लाखो मुलांत बालसाहित्य वाचायला मिळते. मुलांकडे अफाट कल्पनाशक्ती आहे. आजकाल काही पुस्तके गाजविली जातात. तर, काही पिढ्यान्पिढ्या गाजत असतात. बालसाहित्यात सहजवृत्ती असावी. बाल साहित्यिकांची समृद्ध लेखणी बालकांच्या रूपाने उद्याचा समर्थ भारत घडवणार असून, यातूनच देश महासत्ता बनेल. यामुळे भारतीयांनी महासत्तेची स्वप्ने पाहण्यास हरकत नाही, असे मत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. न. म.जोशी यांनी व्यक्त केले.
अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वार्षिक पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे, किरण केंद्रे, डॉ. न. म. जोशी, महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीचे संचालक ज. ग. फगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, कविता मेंहेदळे, मुकुंद तेलीचरी आदी उपस्थित होते.
अक्षराला अक्षरे जोडणारे बालसाहित्य नको, तर सकस साहित्य आहे. त्यासाठी लेखकांनी मेहनत घेण्याची गरज आहे. उद्याचा सुसंस्कारी नागरिक घडविणारे बाल साहित्य हवे. बालक सजग असून, ते विज्ञानाचा विचार करतात, असे मत जोंधळे यांनी व्यक्त केले.
पिढी बदलली असल्याने बाल साहित्याचे रूप आणि स्वरूप बदलले पाहिजे. मुले प्रचंड वाचन करीत आहेत. त्यांची वाचनाची भूक भागविण्याची जबाबदारी लेखकांची आहे. त्यांनी मुलांचे भावविश्व घेऊन मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे. बालसाहित्यात नवे प्रयोग करण्यासाठी प्रचंड वाव असल्याचे केंद्रे म्हणाले.
डॉ. बर्वे यांनी प्रास्ताविक केले. तर, डॉ. दिलीप गरूड यांनी सूत्रसंचालन केले. प्रांजली बर्वे यांनी स्वागत गीत सादर केले.