प्रभात वृत्तसेवा पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रमांची मुदत संपल्याने पदवीपासून वंचित राहिलेल्या तब्बल ९७ हजार विद्यार्थ्यांना विद्यापीठाने मोठा दिलासा दिला आहे. काही कारणास्तव पदवी पूर्ण करू न शकलेल्या या विद्यार्थ्यांचे ब्लॉक केलेले पीआरएन अनब्लॉक करून, त्यांना परीक्षा देण्यासाठी पुन्हा एकदा विशेष संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार, विद्यार्थ्यांना ठराविक कालावधीतच पदवी शिक्षण पूर्ण करणे बंधनकारक असते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे, विशेषतः एखाद-दुसरा विषय राहिल्याने, दतीत पदवी प्राप्त करता आली नाही. अशा विद्यार्थ्यांची पदवी पूर्ण करण्याची मुदत संपुष्टात आल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने त्यांचे पीआरएन (कायम नोंदणी क्रमांक) ब्लॉक केले होते. त्यामुळे हे हजारो विद्यार्थी परीक्षेला बसू शकत नव्हते. गेल्या अनेक महिन्यांपासून पीआरएन ब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी द्यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांनी लावून धरली होती. काही विद्यार्थ्यांनी याबाबत विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन म्हणणे मांडले होते. या मागणीची दखल घेत, प्रथम हा विषय विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत चर्चेला आला. त्यानंतर परीक्षा मंडळाने याचा सविस्तर आढावा घेतला आणि अखेरीस नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या विद्यार्थ्यांना संधी देण्यावर अंतिम मोहोर उमटवण्यात आली. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमधील संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतलेल्या सुमारे ९७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार आहे. त्यांचे पीआरएन लवकरच अनब्लॉक केले जातील. ज्यामुळे त्यांना रखडलेले विषय उत्तीर्ण करून आपली पदवी पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.