Uddhav Thackeray : काश्मीरचे 370 कलम काढले हे महाराष्ट्रात सांगायची गरज काय? उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

मालवण : राज्यात काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या होत्या. त्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तो पराभव उद्धव ठाकरेंच्या फार जिव्हारी लागला होता. काल माविआचे अधिकृत उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली होती. या सभेत त्यांनी लोकसभेच्या पराभवावर भाष्य करत भाजपवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
लोकसभेला आम्ही कमी पडलो. कोकणातील पराभव माझ्या हृदयाला चटका लावून गेला आहे. कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे कोकण असे आपले नाते आहे. हे नाते कोणी तोडू शकत नाही. कोकणावर संकट येते त्यावेळी शिवसेना धावून येते. शिवसेनेसाठी कोकण धावून येतो. राजकारणातला निचपणा कोणी एकेकाळच्या मित्राने केला याचा राग आणि दुःख आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
कलम 370 वरून टीका
यावेळी उद्धव ठाकरेंनी यांनी कलम ३७० वरून भाजपवर निशाणा साधला आहे. काश्मीरचे 370 कलम काढले हे महाराष्ट्रात सांगायची गरज काय? असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाण साधला. तसेच राज्यात अनेक प्रश्न असताना भाजप त्या प्रश्नावर बोलताना दिसत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजप शेतकऱ्यांच्या पीकाला हमीभाव देत नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
आम्हाला राख आणि गुजरातला रांगोळी देता : उद्धव ठाकरे
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रत ज्यावेळी सरकार येईल त्यावेळी लुटारूंनो तुम्हाला उद्योग गुजरातला नेऊ देणार नाही. चांगले उद्योग तिकडे नेता आणि विनाशकारी रिफायनरी आम्हाला देता. आम्हाला राख आणि गुजरातला रांगोळी देता. मोदी शाह तुम्ही आज आहेत, उद्या नाही… तुम्ही गुजरात आणि महाराष्ट्रात भींत बांधत आहात हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र लुटायला न देणारा एकच माणूस आहे तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे…





