भाजपाचे विरोधकांवर दबाव टाकण्याचे राजकारण
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी होत आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्याचे काम हे सरकार करत आहे. एकूणच सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर दबावतंत्र वापरून त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचे राजकारण देशात सुरू आहे. माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्याबाबतीत सुद्धा हेच दिसून येते. सध्याचे गृहमंत्री अमित शहा आकसापोटी हे करत आहेत का? पण जनता हे राजकारण पाहत आहे, निवडणुकीत याचे योग्य उत्तर जनता देईलच, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राष्ट्रीय मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रावर ओढावलेलं महापुराचं संकट अजून पूर्ण ओसरलं सुद्धा नाही आणि इथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा काढत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात महापुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सरकारच्या नियोजनशून्यतेमुळे धरणाच्या पाण्याचा विसर्ग वेळीच करता आला नाही. या सर्व परिस्थितीला फडणवीस सरकार जबाबदार असल्याची टीका देखील नवाब मलिक यांनी केली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असणारे मुख्यमंत्री पूरबाधितांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज होती. त्यांचे उद्धवस्त झालेले संसार पुन्हा नव्याने उभारण्याची अपेक्षा होती. पण हे सरकार केवळ प्रचार करण्यात धन्यता मानत आहे, अशी टीका मलिक यांनी केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर मुख्यमंत्री आपली जबाबदारी झटकून महाराष्ट्रातल्या जनतेकडे दुर्लक्ष करत असतील तर त्याला आमचा ठाम विरोध राहील, असे मलिक म्हणाले.