IND vs ENG Irfan Pathan on Jasprit Bumrah : इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने केवळ तीन सामने खेळले. कार्यभार व्यवस्थापनामुळे त्याला दोन कसोटी सामन्यांमध्ये विश्रांती देण्यात आली होती. तरीही, तीन सामन्यांमध्ये 14 विकेट घेत बुमराह मालिकेतील चौथा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. पण, काही डावांमध्ये त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि विकेट्ससाठी तो झगडताना दिसला. बुमराह त्या अपेक्षांवर खरा उतरला नाही – इरफान पठाण त्यामुळे माजी खेळाडू इरफान पठाणने बुमराहच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इरफानच्या मते, बुमराह नंबर एक गोलंदाजाच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही. त्याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, बुमराहने जेव्हा खेळला तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली. त्याने पाच विकेट्स घेतल्या आणि त्याचे नाव लॉर्ड्सच्या सन्मान फलकावर नोंदवले गेले. पण जेव्हा तुम्ही नंबर एक गोलंदाज असता, तेव्हा तुमच्याकडून त्या स्तराची कामगिरी अपेक्षित असते आणि मला वाटते की बुमराह त्या अपेक्षांवर खरा उतरला नाही.” बुमराहने पहिल्यांदाच एका डावात 100 हून अधिक धावा दिल्या – बुमराहने तीन कसोटी सामन्यांमध्ये 119.4 षटके टाकली. मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत त्याने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एका डावात 100 हून अधिक धावा दिल्या. इरफानने पुढे सांगितले की, “काही प्रसंगांमध्ये बुमराहकडून आणखी एक षटकाची गरज होती. उदाहरणार्थ, लॉर्ड्स कसोटीत जो रूटला त्याने 11 वेळा बाद केले आहे. त्या सामन्यात बुमराहने पाच षटके टाकली, पण सहावे षटक टाकून आणखी जोर लावता आला असता. मला वाटते की त्याने तिथे थोडी संयमाची कमतरता दाखवली. काही निवडीही चुकीच्या होत्या, ज्यांच्याविरुद्ध मी नेहमीच आहे.” हेही वाचा – IND vs ENG : ख्रिस वोक्सने मागितली पंतची माफी, गिलने केले कौतुक; कसोटी मालिकेत शौर्याची झलक! बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजने शानदार कामगिरी केली. पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताला सहा धावांनी विजय मिळवून देण्यात आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत राखण्यात सिराजने महत्त्वाची भूमिका बजावली. सिराजने शेवटच्या सामन्यात नऊ विकेट्स घेतल्या आणि मालिकेत एकूण 23 विकेट्स घेत 185.3 षटके टाकली.