Iran-US tensions: इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी तणाव शिगेला पोहोचला असून, पश्चिम आशियात युद्धाचे ढग दाटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने इराणमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) स्पष्ट केले आहे की, सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाची ‘ॲडव्हायझरी’ – परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आम्ही इराणमधील बदलत्या स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहोत. तेहरानमधील भारतीय दूतावास तिथल्या भारतीय समुदायाशी सतत संपर्कात आहे.” भारत सरकारने यापूर्वीच एक प्रवास मार्गदर्शिका (Advisory) जारी केली आहे. यामध्ये भारतीय नागरिकांना इराणचा अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, जे भारतीय सध्या इराणमध्ये आहेत, त्यांनी उपलब्ध साधनांचा वापर करून स्वदेशात परतण्याचा विचार करावा, असे आवाहन सरकारने केले आहे. ट्रम्प यांचा अल्टिमेटम – २०२६ मध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणू कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकासावर कडक इशारा दिला आहे. “जर इराण करारावर सहमत झाला नाही, तर पुढील १०-१५ दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल,” असे ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले आहे. हेही वाचा – DA Hike: होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी! पगार वाढणार; जाणून घ्या संपूर्ण गणित युद्धाची तयारी? अमेरिकेने पर्शियन गल्फमध्ये आपल्या विमानवाहू युद्धनौका तैनात केल्या आहेत. इराणवर नवे निर्बंध लादण्यात आले असून लष्करी सराव वाढवण्यात आला आहे. प्रत्युत्तर म्हणून इराणने जागतिक तेल व्यापाराचा २०% हिस्सा वाहून नेणाऱ्या ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’मध्ये नौदल सराव करून हा मार्ग बंद केला आहे. ‘व्यापक आणि पश्चात्ताप करायला लावणारे उत्तर देऊ’ – इराण इराणच्या राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे की, जर त्यांच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यावर हल्ला झाला तर त्याचा अर्थ ‘पूर्ण युद्ध’ असा असेल. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अमेरिकेच्या कोणत्याही आक्रमकतेला “व्यापक आणि पश्चात्ताप करायला लावणारे” चोख प्रत्युत्तर दिले जाईल. भारतावर होणारा परिणाम – इराणमध्ये सध्या सुमारे ८,००० भारतीय वास्तव्यास आहेत. भारतासाठी हे संकट दुहेरी चिंतेचा विषय आहे. ८,००० भारतीयांना सुरक्षित बाहेर काढणे हे मोठे आव्हान आहे. भारत इराणकडून होणाऱ्या तेल आयातीवर अवलंबून आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता असून, त्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसू शकतो. भारत सध्या या वादात ‘तटस्थ’ भूमिका बजावत असला, तरी तज्ज्ञांच्या मते भविष्यात भारत मध्यस्थाची भूमिका बजावू शकतो. मात्र, सध्या भारताचा संपूर्ण भर आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेवर आहे. हेही वाचा – Tata Punch EV Facelift: टाटाचा मोठा धमाका! आता फक्त 6 लाख 49 हजारात घरी न्या टाटा पंच EV; फिचर्स पाहून थक्क व्हाल