Lalit Modi IPL : “माझ्याशिवाय IPL कधीच यशस्वी झाली नसती, पण…”; संस्थापक ललित मोदींचे बीसीसीआयवर गंभीर आरोप, पाहा VIDEO
Lalit Modi IPL : आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी अनेक वर्षांनंतर एका मुलाखतीत स्पर्धेबाबत आणि बीसीसीआयबाबत अत्यंत खळबळजनक वक्तव्य केले आहे

Lalit Modi Statement on IPL Success : आयपीएल २०२६ चा १९ वा हंगाम नुकताच दिमाखात संपन्न झाला असून, आज ही लीग जगातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी क्रीडा स्पर्धांपैकी एक बनली आहे. फ्रँचायझी-आधारित क्रीडा स्पर्धांसाठी आयपीएलने एक नवा जागतिक मापदंड तयार केला आहे. दरम्यान, या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आणि आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी अनेक वर्षांनंतर एका मुलाखतीत स्पर्धेबाबत आणि बीसीसीआयबाबत अत्यंत खळबळजनक वक्तव्य केले आहे. “मी नसतो तर आयपीएल कधीच उभी राहिली नसती आणि यशस्वीही झाली नसती,” असा ठाम दावा करत ललित मोदी यांनी क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली आहे.
“प्रत्येक जण माझ्यावर जळत होता!”
‘द स्कूप एक्स्टेंडेड’ या विशेष कार्यक्रमात बोलताना ललित मोदी यांनी आयपीएलमधील आपल्या योगदानाचे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले, “इतर अनेक वादग्रस्त कारणांमुळे मला मुद्दाम टार्गेट करण्यात आलं. त्या काळात प्रत्येक जण माझ्यावर जळत होता. मी जसा कडक स्वभावाचा होतो, तसा नसतो तर हे यश कधीच शक्य झालं नसतं. मी गेल्या १७ वर्षांपासून या स्पर्धेचा भाग नाही, तरीही आज तुम्ही माझी मुलाखत का घेत आहात? कारण या आयपीएलची कल्पना अचानक सुचलेली नव्हती. त्यामागे माझे वैज्ञानिक संशोधन आणि वर्षांचे अनुभव होते. जगभरातील अनेकांनी मी निर्माण केलेली ही सिस्टीम कॉपी करण्याचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले.”
माजी क्रिकेटपटू सबा करीम यांनी नुकताच खुलासा केला होता की, ललित मोदी यांनी १९९० च्या दशकात (टी-२० क्रिकेट अस्तित्वात येण्यापूर्वीच) बीसीसीआयसमोर अशा व्यावसायिक लीगची कल्पना मांडली होती, जी अखेर २००८ मध्ये प्रत्यक्षात आली. आपल्या वादग्रस्त निर्णयांवर बोलताना मोदी म्हणाले की, “लोक म्हणतात मी चुका केल्या, पण माझ्या मते मी कोणतीही चूक केलेली नाही. मला पुन्हा संधी मिळाली, तरी मी माझे निर्णय बदलणार नाही.”
Is bilateral cricket dead? 🏏
IPL founder Lalit Modi seems to think so 🤔
WATCH The Scoop Extended 👉 https://t.co/EqSGLuzIXe pic.twitter.com/LFT1Cg6cmR
— Wisden (@WisdenCricket) June 2, 2026
भारत सोडतानाची ‘ती’ मोठी खंत!
मुलाखतीदरम्यान ललित मोदी यांनी बीसीसीआयच्या कारभारावर बोट ठेवत एक मोठी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “भारत सोडताना काही गोष्टी अपूर्ण राहिल्याचे दुःख मला आजही आहे. आयपीएलच्या संस्थापकाला नेहमीच लीगच्या बोर्डावर एक हक्काची जागा मिळायला हवी होती. मी त्या काळात बीसीसीआयला खूप जास्त अधिकार देऊन मोठी चूक केली. तेव्हा कोणीही आयपीएलला गंभीरतेने घेत नव्हते, बहुतेकांना वाटत होते की हा प्रकल्प अपयशी ठरेल. मी जर त्यावेळी माझ्या अटींवर ठाम राहिलो असतो, तर चित्र वेगळं असतं. मी आयपीएलसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचे संविधानही तयार केले होते.”
ललित मोदींच्या मते, लीगचे प्रशासन हे केवळ बीसीसीआयच्या हातात नसून, आयपीएल फ्रँचायझी मालक आणि बीसीसीआय यांच्या संयुक्त भागीदारीत चालवले जाणे गरजेचे होते, जेणेकरून पारदर्शकता राहिली असती. दरम्यान, २०११ मध्ये ललित मोदी वादामुळे बाहेर पडल्यानंतर चिरायू अमीन, राजीव शुक्ला, रंजीब बिस्वाल, बृजेश पटेल आणि सध्या २०२२ पासून अरुण सिंह धुमल हे आयपीएलचे अध्यक्षपद सांभाळत आहेत.





