भारतात सर्वाधिक वेळा इंटरनेटवर निर्बंध; ५ वर्षांत ५०० हून अधिक वेळा सेवा खंडित, ‘या’ राज्याला बसला सर्वाधिक फटका

नवी दिल्ली – इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे. भारतातही याचा वापर वाढला आहे. परंतु जगाच्या तुलनेत भारतात सर्वाधिकवेळा इंटरनेट बंद राहते. २०२३ मध्ये सर्वाधिक इंटरनेट व्यत्ययाच्या बाबतीत भारत अव्वल स्थानावर राहिला आहे.
गेल्या ५ वर्षांत ५०० हून अधिक वेळा सेवा खंडित करण्यात आली. विशेषत: मणिपूरमध्ये याची सर्वाधिक झळ पोहोचली आहे. त्याचा मोठा फटका दैनंदिन कामकाजाला बसला आहे.
इंटरनेट सेवेच्या व्यत्ययामुळे व्यक्ती, बँकिंग, प्रवास, ऑनलाइन सेवा, अभ्यास आदी कामांत अडथळा निर्माण होतो. मानवी जीवनात इंटरनेट सर्वात महत्त्वाचे असताना भारतात इंटरनेट सर्वाधिक वेळा बंद करावे लागत आहे.
मे ते डिसेंबर २०२३ दरम्यान, मणिपूरमध्ये सुमारे ३२ लाख लोकांना २१२ दिवस इंटरनेट समस्यांना सामोरे जावे लागले. याशिवाय ५ दिवस किंवा त्याहून अधिक काळ चालणा-या शटडाउनची संख्या २०२२ मध्ये १५% वरून २०२३ मध्ये ४१% पर्यंत वाढली आहे.
एका अहवालानुसार इंटरनेट शटडाऊनमुळे इंटरनेट सेवा देणा-या कंपन्यांना तासाला सुमारे २ कोटी ४५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. इंटरनेट सेवा देणा-या या कंपन्यांना सरकारच्या निर्देशानुसार सेवा बंद कराव्या लागतात. मणिपूरमध्ये हिंसक घटनांमध्ये अद्याप घट झालेली नाही.
अशा स्थितीत २०२३ मध्ये राज्यात ३ मे, २५ जुलै, २३ सप्टेंबर, २६ सप्टेंबर, १० नोव्हेंबर, १९ नोव्हेंबर, २ डिसेंबर आणि १८ डिसेंबर रोजी इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली होती. याशिवाय १६ फेब्रुवारी, २४ फेब्रुवारी आणि १० सप्टेंबर २०२४ रोजी इंटरनेट सुविधा खंडित झाली आहे.
त्याच वेळी जम्मू आणि काश्मीरमध्ये इंटरनेट बंदची संख्या २०२२ मधील ४९ वरून २०२३ मध्ये १७ पर्यंत कमी झाली आहे. भारतात इंटरनेट बंद होण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. त्याचा मोठा फटका दैनंदिन कामकाजाला बसला आहे.
२०२३ मध्ये सर्वाधिक वेळा इंटरनेट बंद
म्यानमार – ३७
इराण – ३४
पॅलेस्टाईन – १६
पाकिस्तान – ७
इराक – ६
युक्रेन – ८





