जोहान्सबर्ग – भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ट्रम्पकार्ड ठरेल, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलु क्रिकेटपटू जॅक कॅलिस याने व्यक्त केले आहे. कोहलीने मर्यादीत षटकांच्या सामन्यांतून माघार घेतली असल्याने त्याला पुरेशी विश्रांती मिळाली आहे व त्यामुळेच तो कसोटी मालिकेत धोकादायक ठरेल, असेही कॅलिसने म्हटले आहे.
गेल्या मोसमापासून कोहली ज्या पद्धतीने सातत्य राखत आहे. तसेच एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत त्याने ज्या खेळी केल्या ते पाहता कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना त्याला रोखण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. दक्षिण आफ्रिकेतील सध्याचे वातावरण संमिश्र असले तरीही कोहलीसारख्य दीग्गज फलंदाजाला कोणतेही मैदान, वातावरण व गोलंदाज रोखू शकत नाहीत. त्याची धावांची भूक वाखाणण्याजोगी आहे.
अर्धशतकी खेळीचे शतकी खेळीत रुपांतर करण्याचा त्याचा वेगही अविश्वसनिय आहे. कसोटी क्रिकेटसाठी आदर्श फलंदाज अशी व्याख्या केली तर पहिले नाव कोहलीचेच घ्यावे लागेल. त्याने यापूर्वीही दक्षिण आफ्रिकेत सामने खेळले आहेत. त्यातही त्याने यश मिळवले आहे. आताही मोठ्या कालावधीनंतर जरी भारतीय संघ येथे आलेला असला तरीही ते यजमान संघाच्या तुलनेत जास्त भक्कम दिसत आहेत, असे कॅलिस म्हणाला.
ICC ने ODI World Cup 2024 चं वेळापत्रक केलं जाहीर, टीम इंडिया 20 जानेवारीला खेळणार पहिला सामना…
कोहली ३५ वर्षांचा झाला आहे, त्यामुळेच त्याने कसोटीसाठी पूर्ण तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक मर्यादीत षटकांच्या मालिकांतून माघार घेतली आहे. मात्र, हे कोहलीनेच पहिल्यांदा केलेले नाही. अनेक क्रिकेटपटू एकाच प्रकारच्या क्रिकेटसाठी फिट राहण्यासाठी असा निर्णय घेतात. उलट त्याला जी विश्राती मिळाली आहे त्याचा फटका दक्षिण आफ्रिकेच्याच गोलंदाजांना बसू शकतो. आजवर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत एकदाही मालिका जिंकता आलेली नाही. मात्र, यंदा भारतीय संघाला ही संधी आहे, असेही कॅलिसने सांगितले.