#INDvPak : भारत व पाकिस्तान द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू व्हावी – झका अश्रफ
अहमदाबाद :- भारत व पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू व्हावी, अशी विनंती आपण बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना करणार आहोत, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी म्हटले आहे. शनिवारी येथे होत असलेला भारत व पाकिस्तान यांच्यातील विश्वकरंडक स्पर्धेतील सामना पाहण्यासाठी अश्रफ येथे दाखल झाले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून या दोन संघांत द्विपक्षीय मालिका झालेली नाही. हे दोन संघ केवळ आयसीसी व आशिया क्रिकेट समितीच्याच स्पर्धेत एकमेकांसमोर खेळतात. मात्र, या दोन संघातील सामन्यांची लोकप्रियता पाहता क्रिकेटच्या वाढीसाठी व प्रगतीसाठी या दोन देशांत पूर्वीप्रमाणे द्विपक्षीय मालिका व्हाव्यात, असे मला वाटत आहे, असेही अश्रफ म्हणाले. दरम्यान बीसीसीआयने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक2023 च्या स्पर्धेत उद्या (शनिवार, 14 ऑक्टोबर) महामुकाबला होणार आहे. खरे तर उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने येतात तेव्हा उत्साह शिगेला पोहोचतो. 2023 च्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करणार हे नक्की.
भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर या स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाचवेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला पराभूत करून आपले इरादे स्पष्ट केले होते. यानंतर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. रोहित शर्माच्या शानदार शतकामुळे संघाला मोठा विजय मिळाला. आता भारतीय संघाची नजर विजयाची हॅट्ट्रिक करण्याकडे आहे.
शनिवारी अहमदाबादमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला, तर पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकातही न हारण्याचा सिलसिला कायम राहणार आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारताने आतापर्यंत सात वेळा पाकिस्तानचा सामना केला आहे आणि प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे.





