INDvAFG 2nd T20 (इंदुर) – पहिल्या सामन्यातून वैयक्तिक कारणाने माघार घेतलेला भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली आता अफगाणिस्तानविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यात संघात परतत आहे. मात्र, त्याच्या परतण्यामुळे अंतिम संघात कोणाला स्थान द्यायचे व कोणाला बाहेर ठेवायचे हा दबाव कर्णधार रोहित शर्मावर आला आहे. शिवम दुबेने पहिल्या टी-20 सामन्यांत नाबाद 60 धावांची खेळी केल्याने त्याचे स्थान निश्चित असले तरीही शुभमन गिल, तिलक वर्मा व रिंकू सिंग यांच्यापैकी एकाचे संघातील स्थान जाऊ शकते असेच सध्या चित्र आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या तिन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मासह कोहलीनेही तब्बल 14 महिन्यांच्या खंडानंतर टी-20 संघात पुनरागमन केले होते. मात्र, पहिल्या सामन्यातून कोहलीने वैयक्तीक कारण देत माघार घेतली होती. आता तो या मालिकेतील उरलेल्या दोन्ही लढतींसाठी संघात परतला आहे. अशा स्थितीत अंतिम संघ निवड करताना रोहितसह मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व निवड समितीसमोर कोणाला संघाबाहेर ठेवायचे याचा निर्णय घेण्याची मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे.
पहिल्या साम्यात दुबेने नाबाद 60 धावांची खेळी केली. तर तिलक वर्मा, जीतेश शर्मा, अक्सर पटेल व मुकेश कुमार यांनीही उपयुक्त कामगिरी केली. रिंकू सिंगनेही दुबेसह नाबाद खेळी करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्यामुळे रोहितला दुसर्याच चेंडूवर धावबाद करणारा गिल मुख्य रडारवर असेल. त्यातच यशस्वी जयस्वाल तंदुरुस्त ठरला तर डाव-उजवे समिकरण कायम यशस्वी ठरते हे म्हटले जात असल्याने गिलला बाहेर ठेवत रोहितसह डावखुरा जयस्वाल डावाची सुरुवात करेल. मात्र, त्याचवेळी तिलक व रिंकू यांच्यापैकी किंवा अक्सर पटेल व वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाचा पत्ता कट होऊन कोहलीला अंतिम संघात निवडले जाइल असेही सांगितले जात आहे.
गिलने पहिल्या सामन्यात 12 चेंडूत 23 धावांची खेळी केली असली तरीही यंदाच्या वर्षी वेस्ट इंडिज व अमेरिकेत होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे महत्व लक्षात घेता कोहलीलाही आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांचा अनुभव मिळणे गरजेचे आहे. त्याला पहिल्या सामन्यात खेळता आले नसल्याने उरलेले दोन्ही सामनेत्याला संघातील एक वरिष्ठ खेळाडू म्हणून खेळवावेच लागणार आहेत. त्यातच रोहितला गिलने धावबाद केल्यावर त्यांच्यात वादही घडले होते. रोहितने गिलला बरेच काही सुनावले होते व ते थेट प्रक्षेपणा दरम्यान सगळ्यांना दिसलेही होते. त्यामुळे सध्यातरी कोहलीसाठी गिलची जागा रिकामी केली जाऊ शकते असेही चित्र आहे.
2022 सालानंतर रोहित व कोहलीने या तिन सामन्यांच्या टी-20 मालिकेत खेळण्याची तयारी दर्शवली होती. त्यानूसार त्यांची संघात निवडही झाली. रोहित सलामीच्या सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच धावबाद झाला होता. कोहली संघात परतल्यावर फलंदाजीला आणखी बळकटी येणार असून त्याद्वारे आगामी टी-20 विश्वकरंडाबातही त्यांच्या फॉर्मची चाचपणी करणे निवड समितीला शक्य होणार आहे. कारण ही मालिका पार पडल्यावर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून त्यानंतर लगेचच आयपीएल स्पर्धा होणार आहे. त्यानंतर लगेचच टी-20 विश्वकरंडक स्पर्धा सुरु होत आहे. त्यामुळे हीच मालिका या दोन्ही खेळाडूंसाठी तयारीसाठी अखेरची टी-20 मालिका ठरणार आहे.
#INDvAFG 1st T20 : शिवम दुबेची मॅचविनिंग खेळी; टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय…
दरम्यान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रिंकू सिंगबाबत सकारात्मक संकेत दिले असून तो सातत्यपूर्ण कामगिरी करत असल्याने त्याच्याकडे आम्ही भविष्यातील मधल्या फळीतील भक्कम फलंदाज म्हणून पाहात आहोत असे सांगितले आहे. त्यामुळे कोहलीच्या परतण्याचे त्याच्या स्थानाला धक्का लागण्याची शक्यता खूपच कमी आहे.
दुबेमुळे पंड्यावर दडपण…
हार्दीक पंड्या दुखापतीमुळे सध्या भारतीय संघाबाहेर आहे. त्याचे तंदुरुस्तीसाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्यालाही या मालिकेत खेळायचे होते मात्र, दुखापतीमुळे त्याला या मालिकेला मुकावे लागले. त्याच्या जागी संघात जागा मिळालेल्या शिवम दुबेने पहिल्याच सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी केली तसेच गोलंदाजीत एक बळी मिळवत उत्तम कामगिरीही केली त्यामुळे या मालिकेत त्याने असेच सातत्य राखले तर पंड्याला संघात पुनरागमन करणे कठीण होणार आहे.