संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचे भाकीत
नवी दिल्ली -अंतर्गत समस्यांमुळे पाकिस्तान दिवसेंदिवस दुबळा बनत आहे. त्यातून पुढील काळात त्या देशाचे पाच ते सहा तुकडे होतील, असे भाकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी शुक्रवारी केले. येथे एका कार्यक्रमात बोलताना कुमार यांनी पाकिस्तानमधील अनागोंदीवर नेमकेपणाने बोट ठेवले.
1971 मधील फाळणीमुळे पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. भावी काळात पाकिस्तानची दुसरी फाळणी होऊन त्या देशाचे अनेक तुकडे होऊ शकतात. पाकिस्तानला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समस्यांनी ग्रासले आहे. त्यामुळे पश्तुनिस्तान, बलुचिस्तान, सिंध यांसारखे पाकिस्तानचे प्रांत वेगळे होऊ इच्छितात. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरवर (पीओके) लक्ष केंद्रीत करण्याऐवजी पाकिस्तानने स्वत:च्या प्रांतांकडे अधिक लक्ष द्यावे. अन्यथा, जगाच्या नकाशावरून गायब होण्याची वेळ पाकिस्तानवर येईल, असे त्यांनी म्हटले.
पीओके आणि अक्साई चीन हे भारताचेच भाग असल्याची ठाम भूमिकाही त्यांनी मांडली. भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्याने पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. त्यातून त्या देशाने भारतविरोधी कांगावा सुरू केला आहे. त्यापार्श्वभूमीवर, कुमार यांनी पाकिस्तानमधील स्थितीबाबत भाष्य केले आहे.