सियान्जूर (इंडोनेशिया) – इंडोनेशियात काल झालेल्या भूकंपात मरण पावणाऱ्यांची संख्या आता वाढून 268 झाली आहे. भूकंपामुळे पडलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली अनेक जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजूनही 151 जण बेपत्ता असून त्यांच्या शोधाचे काम सुरू आहे, असे आपत्ती व्यवस्थापन संस्थेने म्हटले आहे.
भूकंपात 1,083 जण जखमी झाले आहेत. भूकंपात जखमी झालेल्यांमध्ये 300 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर 600 पेक्षा अधिक जण किरकोळ जखमी झाले असल्याचे आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या प्रमुखांनी सांगितले.
भूकंपामुळे इंडोनेशियाच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेकडो जणांना रस्त्यावरच आश्रय घ्यावा लागला आहे. अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी तेथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
सियान्जूर शहराच्या वायव्येकडील सिजेदिल शहरात भूकंपामुळे भूस्खलन झाले आहे. जमीन धसल्यामुळे या शहरातील वाहतूक खंडीत झाली आहे. तर अनेक घरांचा पाया खचला आहे. अशा ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण करून अडकलेल्यांच्या सुटकेचे कामही सुरू करण्यात आले आहे. अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्यामुळे मदत आणि बचाव पथके भूकंपग्रस्त भागांपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत आहेत.
जखमींना रुग्णालयात दाखल केले जात असून आता रुग्णालयांमध्ये जखमींसाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. रुग्णालयांच्या आवारातच तंबू ठोकून या अनेक जखमींवर उपचार सुरू करावे लागले आहेत. भूकंपामुळे काही शाळा पडल्यामुळे मृतांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे.
Gujarat Election 2022 : कॉंग्रेसने सरदार पटेलांचा कायम अवमानच केला – अमित शहा
इंडोनेशियातील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मनोकामना व्यक्त करत, या दु:खाच्या काळात इंडोनेशियाच्या पाठीशी भारत ठामपणे उभा असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.