मुंबई – वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंना जीवे मारण्याची धमकी आली असल्याची अफवा उठली असली तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विंडीजमधील भारतीय उच्चायुक्तांना कळविले आहे.
मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय संघाला धमकी देणारा संदेश पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे पाठविण्यात आला होता. त्यांनी हा संदेश बीसीसीआयकडे पाठविला आहे.
या संदेशात तथ्यता किती आहे हे तपासले जात आहे. तरीही आम्ही येथील पोलिसांकडे याबाबत आवश्यक तपशील दिला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्रालय व अँटिग्वा येथील भारतीय दूतावासाकडेही माहिती देण्यात आली आहे . त्यानुसार तेथील स्थानिक प्रशासनाने तत्परतेने पावले उचलली आहेत.
संघातील प्रत्येक सदस्यास एरवीही भरपूर पोलिस संरक्षण दिले जात असते परंतु धमकीमुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तसेच भारतीय खेळाडू राहत असलेल्या हॉटेलमध्येही कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेची सविस्तर माहिती त्वरीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसही पाठविण्यात आली आहे.