साताऱ्याच्या भुमीपुत्राला लडाखमध्ये वीरमरण

सातारा – लडाखमध्ये देशसेवा करत असताना साताऱ्यातील वाई तालुक्यातील भुमीपुत्राला वीरमरण आल्याची माहिती समोर आली आहे. लडाखमधील बर्फाच्छादित प्रदेशात हवामानातील बदलामुळे या जवानास श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे वीरमरण आले आहे.
सोमनाथ मांढरे असे या जवानाचे नाव असून ते वाई तालुक्यातील आसले या गावातील आहे. मांढरे यांची शुक्रवार पहाटेपासून येथील प्रदेशात नेमणूक करण्यात आली होती. यावेऴी ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांना सैन्य दलाकडून ही माहिती देण्यात आली आहे. त्यांनी मांढरे यांच्या कुुटुंबीयांना ही दु:खद घटना कळवली. सोमनाथ मांढरे यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, आठ वर्षांचा मुलगा, अवघ्या दहा महिन्यांची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे.
हुतात्मा जवान सोमनाथ मांढरे यांचे पार्थिव आज (ता. 19) पहाटे दिल्लीत पोहोचेल. त्यानंतर सायंकाळपर्यंत आसले या मूळ गावी पोहोचेल व त्यांच्यावर शासकीय इतमामात आसलेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.





