India-US Trade Agreement : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दबावाखाली केलेला भारत-अमेरिका व्यापार करार (India-US Trade Agreement) भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचा बळी देणारा आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने या करारावर (India-US Trade Agreement) दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर आता पंतप्रधानांनी हा शेतकरीविरोधी करार तातडीने रद्द करावा, असे थेट आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे. मंगळवारी भोपाळ येथे आयोजित ‘किसान महाचौपाल’ या शेतकरी रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, हा व्यापार करार भारतीय बाजारपेठ अमेरिकन कंपन्यांसाठी खुली करणारा असून, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. “हा करार करताना भारतीय शेतकऱ्यांच्या भविष्याचा विचार केला गेला नाही. केवळ आंतरराष्ट्रीय दबावापोटी देशाचे हित गहाण ठेवले जात आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी संसदेत विरोधी पक्षाचा आवाज दाबला जात असल्याचा पुनरुच्चार केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत आपल्याला या विषयावर बोलू दिले गेले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. India US Trade Deal: राहुल गांधी या कराराला पहिल्या दिवसापासून विरोध करत आहेत. यापूर्वीही त्यांनी आपला अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवरुन व दिल्लीतील पत्रकार परिषदांमधून या करारावर ताशेरे ओढले होते. राहुल गांधींनी यापूर्वी अनेकदा असा आरोप केला आहे की, मोदी सरकारचे व्यापार धोरण हे केवळ त्यांच्या मोजक्या उद्योगपती मित्रांना परदेशी भागीदारीत मदत करण्यासाठी बनवले जाते, ज्याचा फटका सामान्य शेतकऱ्याला बसतो. यावेळी राहुल गांधी यांनी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (संरक्षण), शिवराज सिंह चौहान (कृषी) आणि नितीन गडकरी (रस्ते वाहतूक आणि महामार्ग) यांना विश्वासात न घेता पंतप्रधान मोदींनी भारत-अमेरिका व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यास सहमती दर्शवल्याचा दावाही केला. लष्करी निर्णयावर टिप्पणी माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या आत्मचरित्राचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. युद्ध करण्याचा किंवा लष्करी हालचालींचा निर्णय हा शेवटी राजकीय निर्णय असतो, तो केवळ लष्करी निर्णय नसतो, असे ते म्हणाले. यातून त्यांनी सरकारला धोरणात्मक निर्णयांची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. राहुल गांधी यांच्या भोपाळमधील सभेमुळे मध्यप्रदेशातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ‘शेतकरी कार्ड’ खेळण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.